Wednesday, March 17, 2021

डोळ्यामधले आसू पुसती, ओठांवरले गाणे


असे काही दिवस येतात जेव्हा आजूबाजूचं वातावरण अत्यंत सुंदर असतं तुमचा आवडता ऋतू असतो , वेळेत निघालात रस्त्याला गर्दी नाही वेळेत पोहोचलात. एकदम  चांगला चालू असतो दिवस  'पण'... हा 'पण' येतो आणि सगळं सगळं बिघडतं. मनातून बिघडतं . हा 'पण' आहे ना तो भलताच दांगट . कोणत्या ना कोणत्या कारणाने , कोणत्या ना कोणत्या रुपात रोज येत असतो. मग कधी त्याला आपण माणूस म्हणतो  तर  कधी नशीब . मग तो कामाच्या ठिकाणी , घरी , मंदिरात , दवाखान्यात आणि अगदी सोशल मीडियावर कुठेही येतो. 

या 'पण ' च्या अडथळ्यातून कोणी वाचलेला नाही. मग यातून आपण सुटतच नाही का ?  या 'पण' ला घालवायला येतात  ती 'माणसं' . आपली माणसं. आत्ता तुमच्या आजूबाजूला बघा तीच. आपण म्हणतो ना "या माणसाबरोबर vibe जुळते यार" हो तीच. 

तुम्ही विचार करा रणरणत्या उन्हात तुम्ही रस्त्यावरून जाताय आणि अचानक गुलमोहराच्या फुलांनी लगडलेले झाड तुमच्या समोर आले तेव्हा कसं वाटतं?  डोळ्यांनी जेव्हा दुरूनच तुम्ही ती फुलं बघता तेव्हा च शांत , छान वाटायला लागतं. तसं आपली माणसं ही आपल्या आयुष्याचा रस्त्यावरची ही सगळं सग्गळ देणारी झाडं. काही क्षण यांच्या सावलीत बसावं आणि पुन्हा आपल्या रस्त्याने चालू लागावं . तुम्ही बघाल तर ती झाडं आपल्या बरोबर येऊ लागतात. तुम्हाला एकदाच त्या झाडाशी मैत्री करायची आहे मग ते झाड आयुष्यभर तुमच्या बरोबर असेल. हां फक्त स्वार्थ नसावा तुमच्या मनात. 

शेवटी काय हो हा 'पण' येणारच . 

तरीही व्यथा असो , आनंद असो , प्रकाश असो किंवा तिमिर असो... जात पुढे मज राहणे हे आलंच .☺️

Monday, March 1, 2021

बसंत बहार !

 उमललेल्या फुलांकडे ती आता तासभर झाले बघत होती. तीन चार महिन्याआधी लावलेल्या चाफा , मोगरा ,गुलाब आणि तिच्या आवडीचं गोकर्ण याला इतकी सुंदर फुलं आली होती की घराची बाल्कनी अगदी दिवाळीतल्या लायटिंग सारखी दिसत होती. तिला अश्रू अनावर होत होते. तिला की नई घट्ट मिठी मारायची होती त्यांना. हिरव्या पानांना , मऊ फुलांना , कोवळ्या फांद्यांना सगळ्यांना मिठी मारून सांगायचं होत की " अरे किती उशीर लावलात यायला .. मी रोज वाट बघत होते तुमची.. पण आता मी तुम्हाला जाऊ देणार नाही अजिबात."

पण आत्ताच आलेली ती कोवळी फुलं , ही फुलं की नाही अगदी लहान बाळांसारखे असतात. त्यांना अलगद हातात घ्यावं लागतं. आई ला ना कळत च नाही भसकन तोडते फुलं . पण मिठी कशी मारावी ... तुम्हाला जवळ कसं घ्यावं ? .

 उन्हाची एक कोवळी तिरीप झाडा आडून येऊन तिच्या गालावर पडली. गुलाबातून येणाऱ्या त्या प्रकाशाने तिच्या गालावर गुलाबी ठसा उमटवला. त्या उबदार प्रकाशात प्रत्येक झाडाने जणू मिठी मारली . आता तिचा दिवस अत्यंत खुशीत जाणार होता. ती उडया मारत , डोलत बॅग घेऊन कामाला निघाली. फुलं सुद्धा डोलत होती आणि तिच्या परत येण्याची ते वाट बघत होते.

Friday, April 10, 2020

पक्के शेजारी -२

......मला हा त्रास सतत होतो गाण्याचा कार्यक्रम , नाटक , चित्रपट हा शेजार मला अतिशय त्रासदायक ठरलाय. मागे एकदा एका नाटकाला गेलो होतो. उशिरा पोहोचल्यामुळे मागची सीट मिळाली. पहिला प्रयोग असल्यामुळे  नाटकाला अपेक्षेपेक्षा गर्दी .. पडदा उघडला आणि जोरात Announcement झाली. “कोपराssssss”(३दा) मी दचकलो . क्षणभर मला प्रेक्षकातलं कोणी ओरडलं कि काय असं वाटलं(नवीन नाटक असलं कि काहींच्या अंगातली पुरुषोत्तम ची सवय जात नाही). परत Announcement झाली “कोपरा”(परत ३ दा) आता हि मात्र अगदी दबक्या आवाजात झाली म्हणजे खरोखर पिटातल्या माणसाला सुद्धा स्टेजवर कोणी तरी पुटपुटल्याचा भास झाला असावा. कारण उगाच त्याने विंगेत पाहून हातवारे केले. लेखक , दिग्दर्शक कोणाचही नाव सांगितलं नाही (बहुतेक नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांच्या आवेशावरून ठरवणार असतील ) स्टेज वर प्रकाश पडला, कसं बसं स्टेज दिसेल एवढाच. स्टेज च्या डाव्या ‘कोपऱ्यात’ मागे एक खुर्ची ठेवेलेली दिसत होती .तिकडे लक्षपूर्वक बघतोय तो पर्यंत  एक माझ्या वयाचा (तरुण ) मुलगा स्टेज वर जणू काही विंगेतून दाणकन पडला नाही आपटलाच तो . तेवढ्यात माझ्या शेजारून “क्या बात है, सिम्बॉलीझम ” असा आवाज आला. मी पाहिलं तर एक काका अगदी तल्लीन होऊन ते नाटक बघत होते. डोळ्यात अगदी ‘आजि म्या नटश्रेष्ठ पहिले’ असे भाव होते.खर सांगतो सिम्बॉलीझम या शब्दाची भीतीच वाटते मला आपल्याला जे कळाल नाही ते “सिम्बॉलीझम रे!!नाही कळणार तुला” हे वाक्य सर्रास टाकतात.  मला पहिले ते स्टेजवरच्या नटाचे वडीलच वाटलेपण हा च तो अतिसामन्य प्रेक्षक मी ओळखलं. आता नाटक रंगत आलं होत , (नाटककारानुसार). आणि मला हळूहळू मला नाटक कळण बंद व्हायला लागलं होत . एकतर मला जेवढ कळत त्यानुसार नाटक घरात घडत होत.पण असंबद्ध बोलण चालू होत. “सागराच्या लाटांवरून क्षितिजापर्यंत जायचयं” अरे म्हणजे काय ?? बोलायचं म्हणून आणि लिहायचं म्हणून... नवऱ्याबायकोच्या भांडणात सागर आणि क्षितीज कुठून आलं हेच कळत नव्हत. आणि हळू हळू शेजारचा मनुष्य मोर्चा माझ्याकडे वळवू लागून मी पण त्या मोर्च्यात सामील होऊन “क्या बात है”, “काय लिहिलंय”, “काय घेतलाय संवाद” या आरोळ्या देऊन थेटर दुमदुमून टाकाव अशी इच्छा होती. थोड्यावेळाने  ‘तुझी नजर माझ्यावर पडली आणि मी १२ हि ऋतूत  न्हाऊन निघालो” असं नट म्हणाला .यांत  आता तू मला पाहिलं आणि मी प्रेमात पडलो इतका सोपा अर्थ होता. पण ह्या माणसाला त्यात काय जिवनाच तत्वज्ञान कळला समजलं नाही. “ पाहिलं पाहिलं ? श्रीमंत आणि गरीब यांची दरी १२ ऋतूंनी कशी दाखवलीये ?” माझ्या घशात “कशी?” हा प्रश्न अडकून ठेवला होता. पण कसं होत न मला नाटक बघायचं होत म्हणून मी नेहमीचं “ह्म्मम्म्म हो ना” असं समर्पक उत्तर दिलं.
“मी जेव्हा परीक्षक होतो न तेव्हा सादर झालं होत हे नाटक आणि मी तेव्हा या नाटकाला पाहिलं बक्षीस मिळाव म्हणून भांडलो होतो” झालं. माझ्या पोटातच गोळा आला. दुसरी कडे उठून जाणं शक्य नव्हत कारण थेटर भरलं होत. जवळ जवळ पाऊणतास मी कसा बाकीच्या परीक्षकांशी भांडलो, आणि तरी हि दुसर्या नाटकाला बक्षीस कसं दिल , आजकाल लोकांना नाटक कसं कळत नाही.हे ऐकत होतो . शेवटी नाटक संपल(एकदाचं).मी पटकन बाहेर पळालो. आणि आता एक तर कळणाऱ्या नाटकाला जातो आणि कोणाला तरी घेऊन जातो (जे जे आपल्याला मिळेल ते ते वाटून घ्यावे या धर्मानुसार)
प्रत्येक च शेजारी काही त्रासदायक असतो असं नाही काही काही शेजारी सुखावह पण असतात. पण असे शेजारी शेजार पेक्षा समोरच्या खिडकीत , बाल्कनीत असावे असे अनेक कवींनी , चित्रपटात म्हणल्या मुळे शेजार नको पण समोर खिडकी किवा बाल्कनी असावी. चित्रपट नायीकांसारखी कोणीतरी असावी. ज्या बाल्कनीतून  त्या नायिका फक्त ‘हाय’ करतात . आमच्या नशिबात नाही असं काहीही नाही आणि असेल तरी आपल्याला बघेल असं वाटत नाही.
पण कधी कधी असं वाटत कि शेजार हा प्रकारच देवाने का तयार केला असेल? माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे म्हणून तो शेजार स्वीकारतो का,लादला गेला म्हणून. पण मग शेजारच्या काकू “कोलंबीच लोणच आवडत याला म्हणून खास वाटीभर आणल” असं म्हणतात “गावाला गेलो होतो ऊस आणलाय चांगला गोड बघून आणलाय” असे भिसे काका असो, किंवा “आज तुषार चा फोन आला नाही ते स्काईप कसं करायचं ते शिकव न जरा” असा एक आवाज येतो. आणि मग असं वाटत कि हां पण स्वीकारला नाही किंवा लादला नाही तर तो आपण मागून घेतलाय. माणसाने प्रगती केली ती या शेजाऱ्यांबरोबर . शेवटी काय शेजारी हा पहिला पहारेकरी . आपण घरात नसताना तुमचं  पार्सल जपून ठेवणारे शेजारी. घराची किल्ली विश्वासाने ठेवतो ती त्यांच्याकडेच. असा विचार करून मी आपले सारे राग गिळून टाकतो. त्या ज्या कोणी पहिल्या माणसाने देवाला शेजाऱ्यांची ऑर्डर दिली आणि देवानी एक न देता नेहमी प्रमाणे एकावर एक फ्री दोन दिले असणार. तेव्हा त्या माणसाचे काय झाले असणार. आणि तशा ऑर्डरी देवानी आजून किती तयार करून ठेवल्यात कोण जाणे. शेवटी विचार संपतो. शेजारच्यांचा कुत्रा भुंकत राहतो, दुसऱ्याबाजूच्या घरातून कुकर ५ शिट्ट्या मारून थकलेला असतो. आणि मी मात्र तावडीत सापडू नये म्हणून मूक गिळून बसतो.

Monday, April 6, 2020

पक्के शेजारी


सार्वजनिक क्षेत्रात सर्रास आढळणारा माणूस प्राणी म्हणजे शेजारी.ते घराशी निगडीत असो, बस, हॉटेल... त्यांचा सहवास लाभल्यावाचून आपल्याला गत्यंतर नाही.
देवाने माणसाची घडण करताना त्याच्या बरोबर हा शेजारधर्म अशी एक गोड (आपल्यावर) गोष्ट देऊन पाठवली आहे. “जरा साखर देता का?” ह्यासारख्या व्याख्यांनी शेजारधर्माला बदनाम करून टाकलंय. पण तसा शेजार  गुण्या गोविंदाने करायचा वगैरे चा काळ गेला आणि आता “तुमचं पायपुसणं जर परत आमच्या दारात दिसलं तर खिडकीतून खाली टाकून देऊ” असा चालू आहे. अलीकडली गोष्ट आहे.
दुपारचे ४ वाजले होते. ऊन कमी झालं होत म्हणून मी मित्राकडे जायला बिल्डींग मधून खाली उतरलो आणि पायऱ्यांच्या खिंडीतच मला गाठून घोसाळकर आजोबांनी दार उघडून मला विचारलं “काय?” आता या प्रश्नाला काय उत्तर द्यावं हे मला कधीही कळलेल नाही. मराठीत असे प्रश्न आहेत ज्यांची उत्तरच नाहीत . जस कि हे ‘काय?’ , ‘कसं काय?’, ‘कसं चाललय’ आणि ‘बाकी?’ मुळात ‘बाकी’ हा प्रश्न कसा आसू शकतो.गणिताच्या एका शिक्षकाला मराठी विषय शिकवायला लागल्या मुळे  शब्द मराठीत आला असावा !!!! बाकी काही नाही  .
“काय?” पुन्हा एकदा त्यांनी विचारलं. मी काय या प्रश्नाला “काय?” याचं प्रश्नाने उत्तर दिल. “आज घरी जंगी बेत होता म्हणे” (ते नामा म्हणे तुका म्हणे जसं संत वाङ्मयात आहे , तसं शेजार-भंगात ‘होता म्हणे’ आहे. जो सगळ सांगतो तो होता!! ).
मी आपलं जेवढ आश्चर्य दाखवता येईल तेवढं दाखवत “हो!!! तुम्हाला कसं कळल?” खर तर हो एवढं उत्तर देऊन तिथून निसटता येता आलं असते पण आयत्या वेळी ह्या शेजार्यांकडे संमोहन शक्ती असते दुसरे विचार च ते येऊ देत नाहीत.
“कळल मला .आज बाबा बरोबर भाजी आणायला बाहेर पडलास ना ते पाहिलं मी खिडकीतून”
खर तर मी पण त्यांना म्हणणार होतो पार्कात जायच्या नावाखाली कुठे जातात ते मी पण खिडकीतून पाहिलंय. पण मी माझे पत्ते राखून ठेवतो.
“फ्लॉवर बटाटा भाजी आणि आमरस , भजी पुऱ्या बेत उत्तमच कि” या काकांना हे सगळं कळल कुठून हा मला प्रश्न पडला .पण मग काही महिन्यानंतर मला कळल कि हि एक gang आहे. हे सोसायटी मधले आजोबा लोक under home एक संस्था चालवतात. एकमेकांना सगळ्या बातम्या कळत असतात हे मला आमच्या घरचा बेत अख्ख्या बिल्डींग ला कळला तेव्हा लक्षात आलं.
“ तुम्हला माहितीच आहे न सगळं “ मी जरा अंमळ वैतागून बोललो
“शेवटच वर्ष न रे तुझं “ या विषयावर
“हो आणि बहुतेक तुमचं सुद्धा” हा हन्त!!! हे वाक्य बोलताना मी त्यांच्या gang च्या मूळ विषयावरच घाव घातला. आणि नंतर आई बाबां चे अनेक घाव , वार मला सोसावे लागले . थोडक्यात कोण  शेजारी ठरवायचे आपल्या नशिबात नाही. मी म्हणेन लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधल्या जात असतील तर शेजार गाठ हि सुद्धा गत जन्मीच्या पाप पुण्यावरून च बांधली जाते.
अशीच एका शेजार्याशी माझी गाठ एका पुस्तक  प्रदर्शनात पडली. आपल्या आवडीची पुस्तक घायला मी तिथे गेलो होतो.आणि अगदी गर्दी नसेल अश्या वेळेस गेलो होतो. पण म्हणायला प्रदर्शनात गर्दी होती (२० माणस!!! पुस्तक प्रदर्शनात हि गर्दीच म्हणायची). मी कविता सेक्शन च्या इथे कुसुमाग्रज,बोरकर वगैरे पुस्तक बघत असताना अगदी शेजारून “वाह वाह” असा आवाज आला. मी एकवार पाहिलं तर एक वाचक सादरीकरणाच्या तयारीत दिसत होता. कोणाच्या तरी कवितांच पुस्तक हातात होत. आणि वाह वाह मुद्दाम माझं लक्ष जावं आणि मी प्रेक्षकाच काम कराव या साठी केलं होत. मी आपलं स्मितहास्य केलं . त्यावरून त्याने ‘कोणती कविता असेल बर’ असा विचार मी केला असावा असा त्याने विचार करून ते पुस्तक माझ्या समोर धरलं “वाचून बघ तरुणांच्या कविता आहेत” पुस्तकाच नाव होत ‘तृणाचे पिवळे देठ’.
अच्छा”
“एक एक कविता म्हणजे तरुणांच्या मानत काही तरी करून दाखवण्यासाठी प्रेरित करते.आता हि बघ” असं म्हणून त्यांनी कविता ऐकवायला सुरवात केली
“ डोंगराचा कडा आहे काळा काळा
मनाला लावलाय ताळा ताळा
विचार म्हणताय पळा पळा
काळा कडा दिसतो लांब
त्याच्या वर जाऊन थांब (वर या शब्दावर इतक्या मोठ्या आवाजात जोर दिला कि आजूबाजूचे लोक दचकून बघायला लागले )
दिसेल तिथून जग सारे
मोठा हो, मोठा हो प्यारे
डोंगराचा कडा आहे काळा काळा  
हि कविता ऐकून ती कविता फाडून ‘जाळा जाळा’ असं मला झालं होत .त्यानंतर जवळपास पाऊण तास मला स्फूर्तीदायक कविता ऐकवल्या गेल्या. ह्या माणसाच्या शेजाऱ्याने ते पुस्तक लिहिलेलं होतं आणि हा माणूस उत्तम शेजार धर्म पाळत होता.त्या स्फूर्तिदायक कवितांनंतर मी कोणतही पुस्तक न घेता घरी परतलो .
मला हा त्रास सतत होतो गाण्याचा कार्यक्रम , नाटक , चित्रपट हा शेजार मला अतिशय त्रासदायक ठरलाय. मागे एकदा एका नाटकाला गेलो होतो. उशिरा पोहोचल्यामुळे मागची सीट मिळाली होती....
                                                                   क्रमशः


Tuesday, August 6, 2019

भान आहे!!!



मित्रहो,
अवाक् होणं म्हणजे काय असा प्रत्यय माणसाला क्वचितच येतो. परवा म्हणजे  २ ऑगस्टला असाच प्रत्यय आला दोन नाट्यकृती बघताना!!! ‘नाट्यकृती या साठीं कि ‘विचार करा’ अशी कृती या दोन्ही नाट्यप्रयोगात आपल्याला करायला लावते म्हणून.
भरत नाट्य मंदिरात ‘सॉरी परांजपे’ आणि ‘खैरलांजी एपिसोड-२’ हे प्रयोग पाहिले. खरंतर मी यातला ‘सॉरी परांजपे’ चा प्रयोग आधीसुद्धा पाहिला होता (मन भरत नाही कधी कधी) आणि दुसरा पहिल्यांदाच पाहिला. चिन्मय देवनं लिहिलेलं  आणि ऋषी मनोहरने दिग्दर्शित केलेलं ‘सॉरी परांजपे’ हे नाटक बघताना प्रत्येक वेळी प्रत्येक प्रेक्षक नाटकात मांडलेला विषय डोक्यात ठेवूनच बाहेर पडतो. मध्ये तर दोन-तीन लोकांनी संपल्यानंतर वडापावच्या इथे त्या विषयावर गहन चर्चा केली तीसुद्धा मी ऐकली. खर तर हाच नाटकाचा प्रभाव म्हणता येईल; विषय डोक्यातून सुटत नाही हातात वडा-पाव असूनही!!! मी कोणत्याही परिस्थितीत दोन्ही नाटकांच्या कथा मुद्दामच सांगणार नाहीये, तुम्ही स्वतः जाऊन नाटक बघावं अशी माझी इच्छा आहे. चिन्मय चं लिखाण हे अतिशय साधं म्हणजे कोणताही विषय साध्या, सोप्या, वापरातल्या शब्दात तो लिहितो (सांगतो!!) त्यामुळेच  प्रेक्षक शब्दात अडकत नाही आणि त्या लेखनाच्या जोडीला ऋषी, गंधर्व, आदित्य आणि हेमांगी यांचा अभिनय. नाटक हे आभासा सारखं असतं; प्रेक्षकाला “समोर घडतय ते खरं आहे असंच वाटलं पाहिजे” हा त्यामागचा हेतू आणि तो अगदी जमून आलाय.
त्यानंतरच्या नाटकाने तर माणसं जागची हल्लीच नाही (संपल्यानंतरसुद्धा!!!) खैरलांजी हत्याकांडाबद्दल वाचायला बरच मिळेल पण त्याच्या पुढे काय घडलं हे समजण्यासाठी फक्त आणि फक्त हे नाटकच बघावं लागेल म्हणजे डॉक्युड्रामा म्हणा नां!!  या विषयावर नाटक करणं हे मोठं धाडसाचं काम आणि एकपात्री करणं म्हणजे.... असो. सुमेधकुमार इंगळे ने अभ्यासलेले, लिहिलेले, दिग्दर्शिलेले आणि अभिनय केलेले ‘हे’ नाटक. खरंतर वर एकपात्री म्हटलंय त्यातच  हे सगळेच विषय आले. पण मी मुद्दाम परत एकदा हे लिहिले याचं कारण म्हणजे ही सर्व डिपार्टमेंट वेगळी आहेत हे सांगण्यासाठी. एकपात्री असं पटकन म्हणतो आपण ; पण त्यामागे एवढं सगळं असतं हे लक्षात यायला हवं.आणि ते सुमेधकुमार याने एका करंगळीवर उचलावं तसं लीलया पेललंय.
थोडक्यात, ‘आजकल’ या संस्थेने नावाप्रमाणेच आजचे विषय घेतले आणि विचार करायला लावले. “आजकालची तुम्ही पोरं नुसतं मोबाईलवर असता!! देश कसा पुढे नेणारssss” हि वाक्य घशातच  ठेवावी लागतील असे सामाजिक भान ठेवून अभ्यास पूर्ण केलेले हे प्रयोग. पुन्हा याचा प्रयोग असेल तर नक्कीच बघायला जा.