Monday, November 26, 2018

सूर्यास्तोदय

दिवाळी अंकाचा शेवटचा लेख वाचून आजोबांनी अंक रद्दीवर  ठेवला.आजोबांची ही नेहमीची सवय अंक किंवा पेपर वाचून झाला की कोणाचाही विचार न करता ते सरळ रद्दीत टाकतात. आजी ने चहा आणून दिला होता पण आज लक्ष ग्यालरीतुन खाली जात होतं.आज पुण्याहून नातू येणार होता . त्याची तयारी आजोबांनी आधीच करून ठेवली होती ."अग, तो पंखा पाच वर कर गं...या वर्षी मुंबईत जरा जास्तच गरम होतंय .त्याला सवय नसेल"आजोबा

"होय, आजी ने फॅन वाढवला , ...लाडू ही केले आहेत. मला सतत लाडू झाले का ??झाले का?? असं प्लिज नका विचारू. अनेक काम पडली आहेत."

आजोबांचं लक्ष एव्हाना पुन्हा गॅलरीतून खाली गेलेलं होतं. खाली खेळणाऱ्या मुलांचा हा अंपायर आज आपलं सगळं काम थर्ड अंपायर कडे सोपवून वेगळ्याच विचारात होता.

"ठाण्यापर्यंत आले असतील ना??"आजोबा

"लहान मुलाप्रमाणे सारखं सारखं नका हो विचारू , शांत बसून रहा बर खुर्चीत..येईलच आता."आजी

एखादा सणाची छोटं मूल जशी आतुरतेने वाट पाहतं तस आजोबा आज वाट बघत होते.

  "अ ssss प्पाssss"

मोठ्ठा आवाज आला .छोट्याश्या गळ्यातून एक मोठ्ठी आरोळी सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली .नातवाने लगेच आपली बॅग जागेवर ठेवली , हातपाय तोंड धुतले , दोघांना नमस्कार केला आजी आजोबांनी एकमेकांकडे फक्त स्मित हास्य केलं त्या एका स्मित हास्यामध्ये नातू नुसता शहाणा नाही तर समजुतदार सुद्धा झाला हे दिसून येत होतं. एक लाडू तोंडात टाकून "ऑप्पॉsss बिsssच??"

 नातू नेहमी आल्यावर हाच प्रश्न विचारतो आणि आजोबा नाही म्हणतात पण आज त्यांचं नुसतं उत्तर तयार नसून तेच तयार होऊन बसले होते.संध्याकाळी आजोबा आणि नातू दोघचं बीच वर गेले.बीच वर गेल्या गेल्या नातू दिसेल तिथे धावत सुटला.इवल्याश्या पायामध्ये सारा किनारा त्याला सामावून घ्यायचा होता."कित्ती मोठठ आहे ना... एकदम दहा मोठ" शाळेत दहा ही सगळ्यात मोठी संख्या असं शिकवल्यामुळे आपल्या शैलीत त्यानं किनाऱ्याच माप मांडलं.आजोबा सुद्धा नातवामागे पायाचं दुखणं विसरून धावत होते. आजोबा आणि नातवाने त्यानंतर किल्ला केला , भेळ खाल्ली , लाटांवर नाचले, गाणी म्हणली .किल्ला करताना माती चा बेस आजोबांनी केल्या नंतर "बास अप्पा आता किल्ला मी करतो ".किल्ल्यातील बोगदे , छुपे रस्ते, "हा इथे सैनिक इथे थांबणार, आणि सैन्य इथे" हे सगळं ऐकताना आजोबांना भरून आलं. या काही वर्षांमध्ये त्याचं बोलणं बदललं नव्हतं तर आता तो मोठा झाला होता . तो आता अप्पांचा शानु  राहिला नव्हता तर शिवाजी महाराजांच्या सैन्यातला "खबरदार जर टाच मारुनी..." असं म्हणणारा सरदार  होत होता. आजोबा सहजच हसले .त्यांचा बालपणातील त्यांनी बनवलेला किल्ला आणि त्याचं सैन्य  त्यांच्या डोळ्यासमोर क्षणार्धात एका लाटेप्रमाणे आदळून गेले.नेहमीच्या प्रमाणे त्या लाटांनी तो किल्ला मोडला . 'दर वेळेस मी लाटांच्याच जवळ किल्ला का बनवतो?' आजोबांचा लहानपणापासून चा प्रश्न त्यांनी पुन्हा मनातल्या मनात विचारून  आजोबा हसले. पण तो पर्यंत नातवाने आपले लक्ष किल्ल्यावरून हटवले होते."अप्पा ते पा, सूर्योदय.." सकाळची शाळा असल्याने त्याने तोच पहिला होता.आजोबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला "अरे बाळा सूर्यास्त... सूर्य बुडतो ना... "

"श्या..सूर्य उगवताना मी रोज बघतो"

सूर्य उगवताना आणि मावळताना सारखाच दिसतो नाही?फक्त सकाळचा लाल गोळा हा तळपण्यासाठी सज्ज होत असतो आणि संध्याकाळचा तळपुन शांत होत असतो.

आज तश्या उसळणाऱ्या लाटा नव्हत्या, तसा आज शांत होता. कधी कधी असं घडतं, लाटांचा आवाज आपल्याला ऐकत राहवासा वाटतो.आज आजोबा आणि नातू शांत होऊन लाटा पायावर घेत बसले होते

दोघेही त्या सूर्याकडे आपापल्या नजरेने बघत होते.

सूर्य अस्ताला जात होता आणि रात्रीच्या गर्भात त्याच्या सारखा तळपता गोळा दुसऱ्या दिवसाची तयारी करत होता...उद्याच्या सूर्योदयाची 

Thursday, November 8, 2018

प्रिय पु.ल. आपणास.....

प्रिय,
पु.ल.
      आजपासून तुमचं जन्मशताब्दी वर्ष  सुरू झालं आहे. सर्वप्रथम वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुम्ही लिहिलेले लेख, तुमचे नाट्यप्रयोग, तुमची गाणी आणि याही पेक्षा तुम्ही लोकांना जे हसवलंय  या सर्वांचा सार( अमृतच खरंतर) ह्या वर्षात  कार्यक्रमांच्या माध्यमातून होणार आहे.
कार्यक्रमावरून आठवलं मागे एकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथे गटणे, अंतू बर्वा, या पात्रांवर  सादरीकरण चालू होतं. लोक त्या शब्दात आणि नाट्यात इतके रंगले होते की पात्रांनी म्हणण्याआधी पुढचं वाक्य प्रेक्षकांमधून येत होत.
लहानपणी पुस्तकांचं वेड तुम्ही लावलं. तुम्हाला प्रत्यक्ष पाहू शकलो नाही हे आमच्या पिढीचं दुर्दैवच म्हणायचं. पण तुम्हाला जे ऐकलंय, वाचलंय, त्यावरून निश्चित सांगू शकतो की लाडके व्यक्तिमत्त्व हे नुसतंच लाडकं नसून आदर्श सुद्धा होतं आणि आहे. अनेकांसाठी देवासारखे धावून जाणाऱ्या तुम्हाला देव मानण्याची गरजच वाटली नाही.

पाडगावकर लिहितात "पुल स्पर्श होताच दुःखे पळाली.... निराशेतूनी माणसे मुक्त झाली जगू लागली हास्य गंगेत न्हाली" किती समर्पक ओळी

या हास्यगंगेमध्ये आपली सर्व दुःख धुवून माणसं आजही जगायला शिकले आहेत आणि जगताय, जगवताय. आज लहान मुलांना सुद्धा पुल पाठ आहेत तो वाचतो, संवाद बोलतो, कुणी गाणं म्हणतं, कुठे फुलराणी फुलायला लागते;  कारण या हास्य गंगेचा उगम तुमच्या हृदयापासून झाला आणि तो मिळाला या सर्वांच्या हृदय सागराला.

खरंच स्वर्गात ब्रह्मदेवाने विचारल्यानंतर तुमच्या आधी अगणित प्रेक्षकांनीच ब्रह्मदेवाला उच्च स्वरात सांगितलं असेल "की या माणसाने आम्हाला हसवलं" आणि ब्रह्मदेवाने सुद्धा हसत हसत मान्य केलं असेल यात काही शंकाच नाही. त्यांची काय आता चैन आहे पृथ्वीलोका वरील न संपणारे किस्से त्यांना स्वर्गात बसून ऐकता येणार आहेत आणि खरोखरच स्वर्गसुख मिळणारे हे नक्की.
पुन्हा एकदा शुभेच्छा.
                                           तुमचाच,
                                         अमोघ वैद्य