Monday, May 21, 2018

माझे (अ) शुद्धलेखन भाग -१




“मीत्रा,
काय म्हणतोस सर्व काहि कूशल आहे ना? बर्याच दीवसात भेटलो नाहि.लवकरच पूण्याला येतो आहे.तेव्हा भेटु. शीक्षकांना सुद्धा भेटायचं आहे .तूझ्या सोबत शाळेत जाऊन येईन म्हणतो.त्यामूळे वेळ बाजुला काढुन ठेव.”
हा मेसेज आशुतोष असनीकराने मला पाठवला होता.ह्या माणसाचा त्याच्या शुद्धलेखनावर प्रचंड विश्वास आहे म्हणून त्याने ते कधीच सिरीयसली घेतलं नाही.त्याची आणि माझी मैत्रीच मुळात शुद्धलेखनामुळे झाली , कारण संपूर्ण वर्गात तो आणि मीच काय त्या चुका करायचो.
माझ्या शालेय जीवनात माझं मार्कसिक शोषण जर कोणी केलं असेल तर ‘शुद्धलेखन’ याने. गणिताबरोबर दुसऱ्या नंबरला येणाऱ्या या दैत्याने माझी चांगलीच भंबेरी उडवली आहे. माझं जवळपास सत्तर टक्के शालेय बालपण हे मो.रा. वाळिंबे यांचं शुद्धलेखनाचे नियम वाचण्यात गेलं. मुळात मला शुद्ध बोलता येतं,वाचता येतं(असं मी मानतो), पण माहित नाही लिखाणाच्या वेळेस नक्की काय घडतं.आम्हाला ना शाळेत “या दिनाला त्या दीनाने अमुक अमुक केले” अशी वाक्य टाकली जायची मग पहिला दिन कोण आणि दुसरा कोण हे मी दीनवाणेपणाने  सांगायचो. दिवाळीचा तर अभ्यास विचारू नका ‘ त्या काळी ’ आम्हाला दिवाळीचं व्यवसाय दिले जाई. त्या बालवयात ह्या व्यवसायाचा गुंता सोडवण्यात काय नाकीनऊ आलेत हे विचारू नका.त्यामध्ये आम्हाला असेच प्रश्न विचारले जायचे.पण त्याची उत्तरं काय हो घरच्यांना विचारून लिहिता यायची.पण सगळ्यात भयंकर प्रकार कोणता असेल तर तो ‘ निबंध '.
आम्हाला मराठी या विषयाला गायकवाड सर म्हणून  रुद्राचे अवतार होते. प्रत्येक गोष्ट ते चिडूनच शिकवीत.कोणतीही गोष्ट आपल्या उच्च स्वरापेक्षा जास्त ओरडून सांगितली की मुलांना लगेच लक्षात राहते (घाबरून) या त्यांच्या मतांच खंडन साक्षात प्रिन्सिपॉल पण करत नसत. राग (संगीतातला नाही!!)  त्यांच्या नाकावर आणि छडीवर तांडवच करीत असे. ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ ही कविता शिकवताना आम्हाला राठ जमिनीवर  प्रखर ऊन पडलय आणि त्याचे वर्णन म्हणजे ही कविता असं ते शिकवीत. त्या रुद्राचा तिसरा डोळा हा सतत शुद्धलेखनावर असे. त्यांच्या वाणी  मधून आग वर्षाव होतोय असाच वाटायचं . माझा मित्र अत्या सांबारे त्यांना 'अग्यामोहोळ' म्हणायचा.त्यांना मागे कोण बोलतोय हे लगेच कळायचं त्यामुळे "ह्यांना फिक्स तिसरा डोळा आहेच !!!अरे खरच"अश्या अफवा सुद्धा पसरल्या होत्या.त्यांच्या ओरडण्याने समोरच्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांचे काळीज भस्मसात होऊन पाणी पाणी होई. बऱ्याच वेळेस तो बिचारा मीच असायचो.
खरंतर मला गप्पा मारायची प्रचंड आवड त्यामुळे मी प्रश्न-उत्तरं तोंडी पाठ करायचो. वास्तविक ‘प्रश्नाला’ ‘न’ का लागतो हे मला आज पर्यंत कळलं नाही.कारण म्हणताना आपण ‘ण’ म्हणतो. असो,मी पाठांतरात चांगला असल्यामुळे अगदी जोरदार पाठ करून ठेवायचो. पण लहानपणी आपण लेखी परीक्षेला सामोरे जातोय याचा सिरीयसनेस कधी नसायचा(नसतोच!!!). मी आठवीत असतानाची गोष्ट –
सहामाही परीक्षा मी अशीच पाठांतरावर दिली होती.त्यामुळे माझा निकाल लागला. त्यावेळी पालकसभेत माझा मराठीचा पेपर संपूर्ण वर्गामध्ये फिरवला होता.माझ्या गुणांपेक्षा माझ्या शुध्दलेखनाच्या चुकांचा आकडा जास्त होता!!!! “सगळं येऊन सुद्धा या कार्ट्याने शुद्धलेखनात मार्क घालवले, श्या!!!” या वाक्यावरून गणितात कश्या सिली मिस्टेक करतो तश्या काहीश्या झाल्या असाव्यात असं वाटलं. पण या सिली मिस्टेक नसतात. एक वेळ +, - करायला सोपं आहे पण शुद्धलेखन नाही.
मी त्यानंतर शुद्धलेखनाच्या क्लासला सुद्धा जाऊन आलो. पण ‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ याप्रमाणे मला मिळालेल्या शाईपेनचं कौतुक होतं तोपर्यंतच तो क्लास टिकला. (३ते४ दिवस) आमच्या घरात तर “ घरोघरी शुद्धलेखन”, “शुद्धलेखन तुमच्या हातात”, “१० दिवसात शुद्ध करा लेखन”अशी विविध पुस्तकं आली. त्या पुस्तकांमध्ये ‘अमर कमळ बघ’ पासून तर ‘एकसमयावच्छेदेकरून’ पर्यंत सगळं होतं. पण माझ्या बाबतीत मी नसलो तरी माझे ‘ मार्क्स ’ माझ्या विरोधी होते.
एकवेळ मी दिन आणि दीन मधला फरक समजू शकतो पण ‘आणि’ तला ‘ण’ ह्रस्व ऐवजी दीर्घ काढल्याने काय होतं ? क्रीडांगणातला ‘क्री’ ह्रस्व केल्याने खेळ बदलत नाही आणि ‘मी’ चा ‘मि’ केल्याने मीपण जात नाही. पण हे शुद्धलेखन माझ्या बालवयात कड्या टाकण्याच काम करत होतं. शारीरिक ह्या शब्दाने तर मला इतका त्रास दिलाय, काही विचारू नका (अगदी ‘आत्मिक’त्रास म्हणा ना).इ आणि ई यांच्या कडे बघून इ आणि ई याच भावना आल्या आहेत.
                                                                क्रमशः

छायाचित्र -सिद्धार्थ जोशी

दुसऱ्या भागासाठी 👉🏻👉🏻https://arvaidya.blogspot.com/2018/06/blog-post.html