Monday, June 4, 2018

माझे (अ) शुद्धलेखन भाग - २

जसं मराठी तसं संस्कृत. मुळात संस्कृतातलं शुद्धलेखन आणखी कठीण.मला बरीच म् आणि अनुस्वार कधी द्यावे हेच कळत नव्हतं. संस्कृतच्या पेपरमध्ये मराठी शुद्धलेखन आणि सुभाषिते पूर्ण करा तिथलं शुद्धलेखन; यातल्या चुका जर पाणिनीने पहिल्या असत्या तर त्याने “ब्रम्ह सत्य जगत मिथ्या” मानून स्वतःचे व्याकरण घेऊन दूर कुठे तरी निघून गेला असता. 'देव','वन','माला' हे शब्द मला जमतात हो, पण पुढे 'कवी','वारिणी','नदी' हे शब्द आल्यावर पोटात गोळा येतो. संस्कृतात “निरंकुशाः कवयः” असं वाक्य आहे. हे वाचून आपणही कवी व्हावं(म्हणजे सगळं माफ!!!) असा विचारसुद्धा डोक्यात येऊन गेला.
    तीच गत हिंदीची. इथे शुद्धलेखन तर  नंतर; पण हिंदी कसं  बोलावं इथून सुरवात असते.”तुम बागेमे आने वाला है क्या?” असे बोलल्यामुळे हिंदी साहित्यिकांनी वारंवार आपल्या कपाळावर हात मारून घेतलेत.
  ह्रस्व – दीर्घ वेलांटी आणि उकार यांनी मला वेळोवेळी छळले आहे. ’चू’ल आणि ‘चु’लीवर ह्या शब्दांना दीर्घ चा ह्रस्व होणे. घसा आणि घशाचे यात ‘स’ चा ‘श’ होणे किवा शेवटी वेलांटी आली तर ती दीर्घ असावी(जशी ‘असावी’ तली ‘वी’ ) या नियमांनी माझे शालेय जीवन खाल्ले.
आताच्या चौथीच्या मुलाने जर अश्या चुका केल्या तर "व्हॉट ईज धिस? धिस ईज राँग.द राईट वर्ड ईज....." मग तो बॉय राईट वर्ड लिहिणार आणि “गुड बॉय” अशी पदवी त्याला मिळणार .
आमचं शुद्धलेखन बघून आमचे शिक्षक आमच्या हातावर सप्तसूर काढायचे आणि मग ते सुधारल जायचं.
ह्या पाच  भावंडांमध्ये अनुस्वार, ओंकार,एकार हे तसे फार सज्जन. पाच पाण्डवांमधले हे तीन वेगळे धनुर्धर.यांना ह्याचा ना कुठला त्रास ना कुठली तक्रार. ह्रस्व आणि दीर्घ यांच्या नादाला ते जातच नाहीत. एखाद्या समाज सेवकासारखे ते संपूर्ण वेळ समाजाची सेवा करत आपलं आयुष्य सार्थकी लावतात. हे बहुतेक सगळ्यांच्या मर्जीतले त्यामुळे व्याकरणकर्त्यांनी बऱ्याच वेळेला शब्दांच्या शेवटी नाही तर पहिले टाकलं आहे.
   विरामचिन्हे हा प्रकार माझा सर्वात आवडीचा. हे वाक्यांना पूर्ण स्वरूप देतात त्यामुळे मी यांना game changer असं म्हणतो. माझा एक मित्र आहे - 'आदित्य रानडे' खरंतर तसा हा हुशार मुलगा. पण शुध्लेखनामुळे त्यांचं जवळ जवळ होणारं प्रेम रांगोळीसारखं फिस्कटलं. खरंतर या मुलाने प्रेमपत्र खूप मेहनतीने आणि आमच्या मदतीने '‘लिहिले'’होते. पण त्यावर शुद्धलेखनाच्या एका वाक्यामुळे पाणी सांडलं. ते वाक्य पुढीलप्रमाणे-
“चांदण्यांचे कोश माझ्या, प्रियकराला पोहोचवा” या पोहोचवा मुळे तो 'भाऊ' या कॅटगरीमध्ये पोहोचला होता. कारण एका स्वल्पाविरामाने त्याच्या प्रेमाला पूर्णविराम दिला होता.
ह्या शुद्धलेखनाने खरोखर माझे बाल्यजीवन वेठीस धरले.आजही कोणी मला शुद्धलेखनाबद्दल विचारलं तर गुपचूप google वर सर्च मारतो. नाहीतर पेपर वर लिहून कुठलं बरोबर आहे ते तपासून घेतो. अहो, उद्या ब्रह्मदेवाला जरी विचारलं ना, “काय रे बाबा ? शारीरिक मधला पहिला री आणि दुसरा रि कोणता तर तों सुद्धा जगाची सगळी कामं सोडून आपली चारी डोकी या विचारात गुंतवेल. शेवटी तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आला म्हटल्यावर आणि मराठी येत असताना शालेय जीवनात हा त्रास भोगावा लागणारच आहे.
कारण शब्द जर शस्त्र असले तर शुद्धलेखन नक्कीच त्याची धार आहे.