Friday, January 11, 2019

नसतेच लायसन जेव्हा...



वेळ -(कोणतीही)
माणूस हा विसरभोळाच पण कधी कधी हा स्वभाव अंगाशी येतो आणि....
(हे विडंबन काव्य आहे .त्यामुळे तसंच वाचावं....एखादी चाल जर तुमच्या डोक्यात आली तर तो योगायोग नाही)

नसतेच लायसन जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
मग गाडी धरली जाते
मी चिल्लर गोळा करतो
नसतेच....

नो एंट्रीत गाडी घुसवी
मामा तर दिसतच नाही
दडलेला समोरच येतो
नि गाडीला ब्रेकच बसतो
नसतेच...

एक हाती गाडी धरतो
दुसऱ्या हाती किल्ली निघते
मानेने बोलता त्याने
मी गाडी बाजू करतो
नसतेच...

लायसन त्याने मागावे
मी हसूनच त्याला बघतो
हेल्मेट? बोलता त्याने
मी धाराशाही पडतो
नसतेच....

मज बोर्डच दिसला नाही
मी नवीनच आहे येथे
कारणे दिली ही जरी मी
तो निष्ठावंतच असतो
नसतेच.....

दंडाची किंमत बघूनी
मम पगार संपून जातो
खूप किचकिच करुनि मग तो
* हासून शंभरच घेतो*

नसतेच लायसन जेव्हा
जीव तुटका तुटका होतो
मग गाडी धरली जाते
मी चिल्लर गोळा करतो😁😁
         
                                      -अमोघ वैद्य

Monday, November 26, 2018

सूर्यास्तोदय

दिवाळी अंकाचा शेवटचा लेख वाचून आजोबांनी अंक रद्दीवर  ठेवला.आजोबांची ही नेहमीची सवय अंक किंवा पेपर वाचून झाला की कोणाचाही विचार न करता ते सरळ रद्दीत टाकतात. आजी ने चहा आणून दिला होता पण आज लक्ष ग्यालरीतुन खाली जात होतं.आज पुण्याहून नातू येणार होता . त्याची तयारी आजोबांनी आधीच करून ठेवली होती ."अग, तो पंखा पाच वर कर गं...या वर्षी मुंबईत जरा जास्तच गरम होतंय .त्याला सवय नसेल"आजोबा

"होय, आजी ने फॅन वाढवला , ...लाडू ही केले आहेत. मला सतत लाडू झाले का ??झाले का?? असं प्लिज नका विचारू. अनेक काम पडली आहेत."

आजोबांचं लक्ष एव्हाना पुन्हा गॅलरीतून खाली गेलेलं होतं. खाली खेळणाऱ्या मुलांचा हा अंपायर आज आपलं सगळं काम थर्ड अंपायर कडे सोपवून वेगळ्याच विचारात होता.

"ठाण्यापर्यंत आले असतील ना??"आजोबा

"लहान मुलाप्रमाणे सारखं सारखं नका हो विचारू , शांत बसून रहा बर खुर्चीत..येईलच आता."आजी

एखादा सणाची छोटं मूल जशी आतुरतेने वाट पाहतं तस आजोबा आज वाट बघत होते.

  "अ ssss प्पाssss"

मोठ्ठा आवाज आला .छोट्याश्या गळ्यातून एक मोठ्ठी आरोळी सहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली .नातवाने लगेच आपली बॅग जागेवर ठेवली , हातपाय तोंड धुतले , दोघांना नमस्कार केला आजी आजोबांनी एकमेकांकडे फक्त स्मित हास्य केलं त्या एका स्मित हास्यामध्ये नातू नुसता शहाणा नाही तर समजुतदार सुद्धा झाला हे दिसून येत होतं. एक लाडू तोंडात टाकून "ऑप्पॉsss बिsssच??"

 नातू नेहमी आल्यावर हाच प्रश्न विचारतो आणि आजोबा नाही म्हणतात पण आज त्यांचं नुसतं उत्तर तयार नसून तेच तयार होऊन बसले होते.संध्याकाळी आजोबा आणि नातू दोघचं बीच वर गेले.बीच वर गेल्या गेल्या नातू दिसेल तिथे धावत सुटला.इवल्याश्या पायामध्ये सारा किनारा त्याला सामावून घ्यायचा होता."कित्ती मोठठ आहे ना... एकदम दहा मोठ" शाळेत दहा ही सगळ्यात मोठी संख्या असं शिकवल्यामुळे आपल्या शैलीत त्यानं किनाऱ्याच माप मांडलं.आजोबा सुद्धा नातवामागे पायाचं दुखणं विसरून धावत होते. आजोबा आणि नातवाने त्यानंतर किल्ला केला , भेळ खाल्ली , लाटांवर नाचले, गाणी म्हणली .किल्ला करताना माती चा बेस आजोबांनी केल्या नंतर "बास अप्पा आता किल्ला मी करतो ".किल्ल्यातील बोगदे , छुपे रस्ते, "हा इथे सैनिक इथे थांबणार, आणि सैन्य इथे" हे सगळं ऐकताना आजोबांना भरून आलं. या काही वर्षांमध्ये त्याचं बोलणं बदललं नव्हतं तर आता तो मोठा झाला होता . तो आता अप्पांचा शानु  राहिला नव्हता तर शिवाजी महाराजांच्या सैन्यातला "खबरदार जर टाच मारुनी..." असं म्हणणारा सरदार  होत होता. आजोबा सहजच हसले .त्यांचा बालपणातील त्यांनी बनवलेला किल्ला आणि त्याचं सैन्य  त्यांच्या डोळ्यासमोर क्षणार्धात एका लाटेप्रमाणे आदळून गेले.नेहमीच्या प्रमाणे त्या लाटांनी तो किल्ला मोडला . 'दर वेळेस मी लाटांच्याच जवळ किल्ला का बनवतो?' आजोबांचा लहानपणापासून चा प्रश्न त्यांनी पुन्हा मनातल्या मनात विचारून  आजोबा हसले. पण तो पर्यंत नातवाने आपले लक्ष किल्ल्यावरून हटवले होते."अप्पा ते पा, सूर्योदय.." सकाळची शाळा असल्याने त्याने तोच पहिला होता.आजोबांनी त्याच्या डोक्यावर हात ठेवला "अरे बाळा सूर्यास्त... सूर्य बुडतो ना... "

"श्या..सूर्य उगवताना मी रोज बघतो"

सूर्य उगवताना आणि मावळताना सारखाच दिसतो नाही?फक्त सकाळचा लाल गोळा हा तळपण्यासाठी सज्ज होत असतो आणि संध्याकाळचा तळपुन शांत होत असतो.

आज तश्या उसळणाऱ्या लाटा नव्हत्या, तसा आज शांत होता. कधी कधी असं घडतं, लाटांचा आवाज आपल्याला ऐकत राहवासा वाटतो.आज आजोबा आणि नातू शांत होऊन लाटा पायावर घेत बसले होते

दोघेही त्या सूर्याकडे आपापल्या नजरेने बघत होते.

सूर्य अस्ताला जात होता आणि रात्रीच्या गर्भात त्याच्या सारखा तळपता गोळा दुसऱ्या दिवसाची तयारी करत होता...उद्याच्या सूर्योदयाची 

Thursday, November 8, 2018

प्रिय पु.ल. आपणास.....

प्रिय,
पु.ल.
      आजपासून तुमचं जन्मशताब्दी वर्ष  सुरू झालं आहे. सर्वप्रथम वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. तुम्ही लिहिलेले लेख, तुमचे नाट्यप्रयोग, तुमची गाणी आणि याही पेक्षा तुम्ही लोकांना जे हसवलंय  या सर्वांचा सार( अमृतच खरंतर) ह्या वर्षात  कार्यक्रमांच्या माध्यमातून होणार आहे.
कार्यक्रमावरून आठवलं मागे एकदा एका कार्यक्रमाला गेलो होतो तिथे गटणे, अंतू बर्वा, या पात्रांवर  सादरीकरण चालू होतं. लोक त्या शब्दात आणि नाट्यात इतके रंगले होते की पात्रांनी म्हणण्याआधी पुढचं वाक्य प्रेक्षकांमधून येत होत.
लहानपणी पुस्तकांचं वेड तुम्ही लावलं. तुम्हाला प्रत्यक्ष पाहू शकलो नाही हे आमच्या पिढीचं दुर्दैवच म्हणायचं. पण तुम्हाला जे ऐकलंय, वाचलंय, त्यावरून निश्चित सांगू शकतो की लाडके व्यक्तिमत्त्व हे नुसतंच लाडकं नसून आदर्श सुद्धा होतं आणि आहे. अनेकांसाठी देवासारखे धावून जाणाऱ्या तुम्हाला देव मानण्याची गरजच वाटली नाही.

पाडगावकर लिहितात "पुल स्पर्श होताच दुःखे पळाली.... निराशेतूनी माणसे मुक्त झाली जगू लागली हास्य गंगेत न्हाली" किती समर्पक ओळी

या हास्यगंगेमध्ये आपली सर्व दुःख धुवून माणसं आजही जगायला शिकले आहेत आणि जगताय, जगवताय. आज लहान मुलांना सुद्धा पुल पाठ आहेत तो वाचतो, संवाद बोलतो, कुणी गाणं म्हणतं, कुठे फुलराणी फुलायला लागते;  कारण या हास्य गंगेचा उगम तुमच्या हृदयापासून झाला आणि तो मिळाला या सर्वांच्या हृदय सागराला.

खरंच स्वर्गात ब्रह्मदेवाने विचारल्यानंतर तुमच्या आधी अगणित प्रेक्षकांनीच ब्रह्मदेवाला उच्च स्वरात सांगितलं असेल "की या माणसाने आम्हाला हसवलं" आणि ब्रह्मदेवाने सुद्धा हसत हसत मान्य केलं असेल यात काही शंकाच नाही. त्यांची काय आता चैन आहे पृथ्वीलोका वरील न संपणारे किस्से त्यांना स्वर्गात बसून ऐकता येणार आहेत आणि खरोखरच स्वर्गसुख मिळणारे हे नक्की.
पुन्हा एकदा शुभेच्छा.
                                           तुमचाच,
                                         अमोघ वैद्य

Thursday, October 18, 2018

म्यानर्स...


दोन चार दिवस मी घरातून बाहेरच पडणार नाहीये.जिथे तिथे हा प्रकार वाढतच चाललाय.तुम्हाला सांगतो बाहेर पडायची भीतीच वाटते आता.माझ्या आतापर्यंतच्या त्रासांमध्ये नंबर एक च्या हि वरती कोणाचा नंबर लागत असेल तर तो या म्यानर्स वाल्या लोकांचा. आपण आपल्या प्रमाणे चालतो हो!! पण हे असे बघतात कि “तुला देहांत प्रय्श्चीत्ताशिवाय गत्यंतर नाही”.अत्ताचीच गोष्ट. एका नवीन मित्राच्या घरी  त्याने बोलावलं म्हणून गेलो होतो.घर म्हणजे घर नाहीच मला तर ते मोठा हॉटेल च वाटलं.घरात शहनाई (का पिपाणी?) शांत आवाजात चालू होती. मी आपल्या चपला सोई प्रमाणे घराबाहेर काढल्या. “अरे इथे नाही आत काढ” हे म्हणजे जरा वेगळच होतं.म्हणजे आता पर्यंत ‘चपला घराबाहेर काढव्यात’ अश्या पाट्या वाचणारा मी हे ऐकून आता चपला ठेवायच्या तरी कुठे या प्रश्नात मी पडलो असता त्या महाशयांनी जवळच्याच एका कपाटाच दार उघडलं आणि “हां इथे ठेव” म्हणजे चपला या कपाटात  ठेवायच्या? असो सांगितल्या प्रमाणे मी आपल्या त्या हाताने चपला कपाटात ठेवल्या. आत पाहतो तर मोठा सोफा , मोठं टेबल, लाईट चा झगमगाट आणि ते मागचं गाणं.आणि त्या सगळ्या वातावरणात “आक् छी!!” असं माशी शिंकण्याचं काम माझ्या शिंकेने झालं.बस्स!!! ते वातावरण बदलण्यात माझा हातभार बराच लागला होता कारण त्या नंतर सगळे माझ्या कडे एकटक बघत होते. शिंकेनंतर मी “स्कु्युझ”मी किवा “ब्लेस मी” असं म्यानर्स प्रमाणे वागणं अपेक्षित होतं.शेवटी माझा मित्राने उगा “हहह ब्लेस यु” म्हंटल. मला ओशाळल्या सारखच झालं. पुन्हा जेवणाच्या टेबलावर हि तसच  भयंकर शांतता ( मागं ते music चालूचे) चमच्याचा सुद्धा आवाज करायचा नाही.मी आपलं खाणं घाश्खाली घातलं ,आवंढा गिळला आणि उगाच आपलं इंग्रजी मध्ये “ok bye, see you latter (R र्ळ सारखा ... तेवढच वजन पडत इति सम्या गोखले )
मला खरोखर या लोकांची भीती वाटते. केव्हा,कुठे आणि कसे भेटतील याचा काही अंदाज नाही म्हणून मी सहसा पॉश हॉटेल असेल तर दोनचार मित्रांचे सल्ले घेऊनच जातो.डिश च्या कोणत्या बाजूला चमचा आणि काटाचमचा ठेवायचा?रोटीची प्लेट कोणती आणि भाजीची कोणती?त्या धार नसलेल्या सुरीने करायचं काय असतं?असे प्रश्न मला तिथे बसल्यावर उद्भवतात. बर ती सुरी धरायची पण एक पद्धत असते म्हणे.
हे लोक इथेच थांबत नाहीत तर कुठे जांभई आली कि तोंडासमोर समोर चुटक्या वाजवतात. मला काही दिवस कळतच नव्हतं मला वाटायच कि आवाज सुधारण्यासाठी असेल बुवा!!.पण ते म्यानर्स असतात.थोड चुकलो कि “म्यानरलेस!!! म्यानरलेस!!!” असे शब्द कानावर येतात.
याच लोकांची पुढची स्टेज म्हणजे सोफेस्टिकेटेड.या लोकांचा मला विशेष राग आहे. “काय रे!! कसाएस??” हा किती सोपा प्रश्न आहे कि नाही. एखादा माणूस “मस्त” असं उत्तर देईल पण हे “mir geht es gut.und dir?” अश्या सवती भाषेत उत्तर येतं. “अरे avengers पाहिला का?” असं विचारावं तर “छे रे असल्या कसल्या फिल्म्स बघतात रे!! Art films बघा,art films!! मी तर तेवढ्याच बघतो.”
या लोकांबरोबर party ला जायचं म्हणलं कि धस्सच होतं.मध्ये एकदा अशाच एका party ला गेलो होतो.आणि नेमका एक अख्खा गटच तिथे आला होता मग काय त्या सिंहाच्या party मध्ये मी उंदीर आल्यासारखा बसलो होतो. त्यांच्यात म्हणजे ‘काही बोलायचे आहे पण बोलणार नाही’ अशी स्थिती असते.
“अरे मी us ला जाऊन आलो. परिस्थिती काही चांगली नाही बरका म्हणजे आपला ट्रम्प आहे ना ट्रम्प....”(छे छे छे त्या पुणेरी महाभागाने ट्रम्प जणू पुणे महानगर पालिकेत असल्या  सारखं ‘आपला’हा शब्द वापररला) किंवा “ अरे मी आताच john lock ची philosophy वाचली. कहर आहे रे कहर....वगैरे वगैरे त्यानंतर foreign culture,museums , किंवा art gallery मधलं आपल्याला बिलकुल न कळलेल्या पेंटिंग विषयी स्तुती सुमनं.
ह्यांच्या पासून वाचायचा एकच मार्ग आपण सुद्धा असेच वाहत्या गंगेत डुबकी मारावी – नाही नाही नाही हे शक्य नाही कदापि नाही.कधी कधी मी असं करण्याचा प्रयत्न करतो पण गीतरामायणाप्रमाणे “पुण्य सरे कि,सरले माझ्या बाहू मधले प्राण.आज का निष्फळ होती बाण ” या प्रमाणे हालत होते . पुन्हा ते वरचढ ठरतात आणि मी आहे रे गटातून नाही रे गटात येवून बसतो
थोडक्यात काय तुम्ही कितीही विद्वान असाल पण जर तुम्हाला काटाचमच्याने आणि त्या धार नसलेल्या सुरीने खाता येत नसेल तर तर तुम्ही निव्वळ अज्ञानी ठरतात.आणि चारी बाजूंनी आवाज येतो.
“म्यानरलेस!!!  म्यानरलेस!!!”
छायाचित्र - सिद्धार्थ जोशी (@joshisid -on insta)

Monday, June 4, 2018

माझे (अ) शुद्धलेखन भाग - २

जसं मराठी तसं संस्कृत. मुळात संस्कृतातलं शुद्धलेखन आणखी कठीण.मला बरीच म् आणि अनुस्वार कधी द्यावे हेच कळत नव्हतं. संस्कृतच्या पेपरमध्ये मराठी शुद्धलेखन आणि सुभाषिते पूर्ण करा तिथलं शुद्धलेखन; यातल्या चुका जर पाणिनीने पहिल्या असत्या तर त्याने “ब्रम्ह सत्य जगत मिथ्या” मानून स्वतःचे व्याकरण घेऊन दूर कुठे तरी निघून गेला असता. 'देव','वन','माला' हे शब्द मला जमतात हो, पण पुढे 'कवी','वारिणी','नदी' हे शब्द आल्यावर पोटात गोळा येतो. संस्कृतात “निरंकुशाः कवयः” असं वाक्य आहे. हे वाचून आपणही कवी व्हावं(म्हणजे सगळं माफ!!!) असा विचारसुद्धा डोक्यात येऊन गेला.
    तीच गत हिंदीची. इथे शुद्धलेखन तर  नंतर; पण हिंदी कसं  बोलावं इथून सुरवात असते.”तुम बागेमे आने वाला है क्या?” असे बोलल्यामुळे हिंदी साहित्यिकांनी वारंवार आपल्या कपाळावर हात मारून घेतलेत.
  ह्रस्व – दीर्घ वेलांटी आणि उकार यांनी मला वेळोवेळी छळले आहे. ’चू’ल आणि ‘चु’लीवर ह्या शब्दांना दीर्घ चा ह्रस्व होणे. घसा आणि घशाचे यात ‘स’ चा ‘श’ होणे किवा शेवटी वेलांटी आली तर ती दीर्घ असावी(जशी ‘असावी’ तली ‘वी’ ) या नियमांनी माझे शालेय जीवन खाल्ले.
आताच्या चौथीच्या मुलाने जर अश्या चुका केल्या तर "व्हॉट ईज धिस? धिस ईज राँग.द राईट वर्ड ईज....." मग तो बॉय राईट वर्ड लिहिणार आणि “गुड बॉय” अशी पदवी त्याला मिळणार .
आमचं शुद्धलेखन बघून आमचे शिक्षक आमच्या हातावर सप्तसूर काढायचे आणि मग ते सुधारल जायचं.
ह्या पाच  भावंडांमध्ये अनुस्वार, ओंकार,एकार हे तसे फार सज्जन. पाच पाण्डवांमधले हे तीन वेगळे धनुर्धर.यांना ह्याचा ना कुठला त्रास ना कुठली तक्रार. ह्रस्व आणि दीर्घ यांच्या नादाला ते जातच नाहीत. एखाद्या समाज सेवकासारखे ते संपूर्ण वेळ समाजाची सेवा करत आपलं आयुष्य सार्थकी लावतात. हे बहुतेक सगळ्यांच्या मर्जीतले त्यामुळे व्याकरणकर्त्यांनी बऱ्याच वेळेला शब्दांच्या शेवटी नाही तर पहिले टाकलं आहे.
   विरामचिन्हे हा प्रकार माझा सर्वात आवडीचा. हे वाक्यांना पूर्ण स्वरूप देतात त्यामुळे मी यांना game changer असं म्हणतो. माझा एक मित्र आहे - 'आदित्य रानडे' खरंतर तसा हा हुशार मुलगा. पण शुध्लेखनामुळे त्यांचं जवळ जवळ होणारं प्रेम रांगोळीसारखं फिस्कटलं. खरंतर या मुलाने प्रेमपत्र खूप मेहनतीने आणि आमच्या मदतीने '‘लिहिले'’होते. पण त्यावर शुद्धलेखनाच्या एका वाक्यामुळे पाणी सांडलं. ते वाक्य पुढीलप्रमाणे-
“चांदण्यांचे कोश माझ्या, प्रियकराला पोहोचवा” या पोहोचवा मुळे तो 'भाऊ' या कॅटगरीमध्ये पोहोचला होता. कारण एका स्वल्पाविरामाने त्याच्या प्रेमाला पूर्णविराम दिला होता.
ह्या शुद्धलेखनाने खरोखर माझे बाल्यजीवन वेठीस धरले.आजही कोणी मला शुद्धलेखनाबद्दल विचारलं तर गुपचूप google वर सर्च मारतो. नाहीतर पेपर वर लिहून कुठलं बरोबर आहे ते तपासून घेतो. अहो, उद्या ब्रह्मदेवाला जरी विचारलं ना, “काय रे बाबा ? शारीरिक मधला पहिला री आणि दुसरा रि कोणता तर तों सुद्धा जगाची सगळी कामं सोडून आपली चारी डोकी या विचारात गुंतवेल. शेवटी तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आला म्हटल्यावर आणि मराठी येत असताना शालेय जीवनात हा त्रास भोगावा लागणारच आहे.
कारण शब्द जर शस्त्र असले तर शुद्धलेखन नक्कीच त्याची धार आहे.