Thursday, October 18, 2018

म्यानर्स...


दोन चार दिवस मी घरातून बाहेरच पडणार नाहीये.जिथे तिथे हा प्रकार वाढतच चाललाय.तुम्हाला सांगतो बाहेर पडायची भीतीच वाटते आता.माझ्या आतापर्यंतच्या त्रासांमध्ये नंबर एक च्या हि वरती कोणाचा नंबर लागत असेल तर तो या म्यानर्स वाल्या लोकांचा. आपण आपल्या प्रमाणे चालतो हो!! पण हे असे बघतात कि “तुला देहांत प्रय्श्चीत्ताशिवाय गत्यंतर नाही”.अत्ताचीच गोष्ट. एका नवीन मित्राच्या घरी  त्याने बोलावलं म्हणून गेलो होतो.घर म्हणजे घर नाहीच मला तर ते मोठा हॉटेल च वाटलं.घरात शहनाई (का पिपाणी?) शांत आवाजात चालू होती. मी आपल्या चपला सोई प्रमाणे घराबाहेर काढल्या. “अरे इथे नाही आत काढ” हे म्हणजे जरा वेगळच होतं.म्हणजे आता पर्यंत ‘चपला घराबाहेर काढव्यात’ अश्या पाट्या वाचणारा मी हे ऐकून आता चपला ठेवायच्या तरी कुठे या प्रश्नात मी पडलो असता त्या महाशयांनी जवळच्याच एका कपाटाच दार उघडलं आणि “हां इथे ठेव” म्हणजे चपला या कपाटात  ठेवायच्या? असो सांगितल्या प्रमाणे मी आपल्या त्या हाताने चपला कपाटात ठेवल्या. आत पाहतो तर मोठा सोफा , मोठं टेबल, लाईट चा झगमगाट आणि ते मागचं गाणं.आणि त्या सगळ्या वातावरणात “आक् छी!!” असं माशी शिंकण्याचं काम माझ्या शिंकेने झालं.बस्स!!! ते वातावरण बदलण्यात माझा हातभार बराच लागला होता कारण त्या नंतर सगळे माझ्या कडे एकटक बघत होते. शिंकेनंतर मी “स्कु्युझ”मी किवा “ब्लेस मी” असं म्यानर्स प्रमाणे वागणं अपेक्षित होतं.शेवटी माझा मित्राने उगा “हहह ब्लेस यु” म्हंटल. मला ओशाळल्या सारखच झालं. पुन्हा जेवणाच्या टेबलावर हि तसच  भयंकर शांतता ( मागं ते music चालूचे) चमच्याचा सुद्धा आवाज करायचा नाही.मी आपलं खाणं घाश्खाली घातलं ,आवंढा गिळला आणि उगाच आपलं इंग्रजी मध्ये “ok bye, see you latter (R र्ळ सारखा ... तेवढच वजन पडत इति सम्या गोखले )
मला खरोखर या लोकांची भीती वाटते. केव्हा,कुठे आणि कसे भेटतील याचा काही अंदाज नाही म्हणून मी सहसा पॉश हॉटेल असेल तर दोनचार मित्रांचे सल्ले घेऊनच जातो.डिश च्या कोणत्या बाजूला चमचा आणि काटाचमचा ठेवायचा?रोटीची प्लेट कोणती आणि भाजीची कोणती?त्या धार नसलेल्या सुरीने करायचं काय असतं?असे प्रश्न मला तिथे बसल्यावर उद्भवतात. बर ती सुरी धरायची पण एक पद्धत असते म्हणे.
हे लोक इथेच थांबत नाहीत तर कुठे जांभई आली कि तोंडासमोर समोर चुटक्या वाजवतात. मला काही दिवस कळतच नव्हतं मला वाटायच कि आवाज सुधारण्यासाठी असेल बुवा!!.पण ते म्यानर्स असतात.थोड चुकलो कि “म्यानरलेस!!! म्यानरलेस!!!” असे शब्द कानावर येतात.
याच लोकांची पुढची स्टेज म्हणजे सोफेस्टिकेटेड.या लोकांचा मला विशेष राग आहे. “काय रे!! कसाएस??” हा किती सोपा प्रश्न आहे कि नाही. एखादा माणूस “मस्त” असं उत्तर देईल पण हे “mir geht es gut.und dir?” अश्या सवती भाषेत उत्तर येतं. “अरे avengers पाहिला का?” असं विचारावं तर “छे रे असल्या कसल्या फिल्म्स बघतात रे!! Art films बघा,art films!! मी तर तेवढ्याच बघतो.”
या लोकांबरोबर party ला जायचं म्हणलं कि धस्सच होतं.मध्ये एकदा अशाच एका party ला गेलो होतो.आणि नेमका एक अख्खा गटच तिथे आला होता मग काय त्या सिंहाच्या party मध्ये मी उंदीर आल्यासारखा बसलो होतो. त्यांच्यात म्हणजे ‘काही बोलायचे आहे पण बोलणार नाही’ अशी स्थिती असते.
“अरे मी us ला जाऊन आलो. परिस्थिती काही चांगली नाही बरका म्हणजे आपला ट्रम्प आहे ना ट्रम्प....”(छे छे छे त्या पुणेरी महाभागाने ट्रम्प जणू पुणे महानगर पालिकेत असल्या  सारखं ‘आपला’हा शब्द वापररला) किंवा “ अरे मी आताच john lock ची philosophy वाचली. कहर आहे रे कहर....वगैरे वगैरे त्यानंतर foreign culture,museums , किंवा art gallery मधलं आपल्याला बिलकुल न कळलेल्या पेंटिंग विषयी स्तुती सुमनं.
ह्यांच्या पासून वाचायचा एकच मार्ग आपण सुद्धा असेच वाहत्या गंगेत डुबकी मारावी – नाही नाही नाही हे शक्य नाही कदापि नाही.कधी कधी मी असं करण्याचा प्रयत्न करतो पण गीतरामायणाप्रमाणे “पुण्य सरे कि,सरले माझ्या बाहू मधले प्राण.आज का निष्फळ होती बाण ” या प्रमाणे हालत होते . पुन्हा ते वरचढ ठरतात आणि मी आहे रे गटातून नाही रे गटात येवून बसतो
थोडक्यात काय तुम्ही कितीही विद्वान असाल पण जर तुम्हाला काटाचमच्याने आणि त्या धार नसलेल्या सुरीने खाता येत नसेल तर तर तुम्ही निव्वळ अज्ञानी ठरतात.आणि चारी बाजूंनी आवाज येतो.
“म्यानरलेस!!!  म्यानरलेस!!!”
छायाचित्र - सिद्धार्थ जोशी (@joshisid -on insta)

Monday, June 4, 2018

माझे (अ) शुद्धलेखन भाग - २

जसं मराठी तसं संस्कृत. मुळात संस्कृतातलं शुद्धलेखन आणखी कठीण.मला बरीच म् आणि अनुस्वार कधी द्यावे हेच कळत नव्हतं. संस्कृतच्या पेपरमध्ये मराठी शुद्धलेखन आणि सुभाषिते पूर्ण करा तिथलं शुद्धलेखन; यातल्या चुका जर पाणिनीने पहिल्या असत्या तर त्याने “ब्रम्ह सत्य जगत मिथ्या” मानून स्वतःचे व्याकरण घेऊन दूर कुठे तरी निघून गेला असता. 'देव','वन','माला' हे शब्द मला जमतात हो, पण पुढे 'कवी','वारिणी','नदी' हे शब्द आल्यावर पोटात गोळा येतो. संस्कृतात “निरंकुशाः कवयः” असं वाक्य आहे. हे वाचून आपणही कवी व्हावं(म्हणजे सगळं माफ!!!) असा विचारसुद्धा डोक्यात येऊन गेला.
    तीच गत हिंदीची. इथे शुद्धलेखन तर  नंतर; पण हिंदी कसं  बोलावं इथून सुरवात असते.”तुम बागेमे आने वाला है क्या?” असे बोलल्यामुळे हिंदी साहित्यिकांनी वारंवार आपल्या कपाळावर हात मारून घेतलेत.
  ह्रस्व – दीर्घ वेलांटी आणि उकार यांनी मला वेळोवेळी छळले आहे. ’चू’ल आणि ‘चु’लीवर ह्या शब्दांना दीर्घ चा ह्रस्व होणे. घसा आणि घशाचे यात ‘स’ चा ‘श’ होणे किवा शेवटी वेलांटी आली तर ती दीर्घ असावी(जशी ‘असावी’ तली ‘वी’ ) या नियमांनी माझे शालेय जीवन खाल्ले.
आताच्या चौथीच्या मुलाने जर अश्या चुका केल्या तर "व्हॉट ईज धिस? धिस ईज राँग.द राईट वर्ड ईज....." मग तो बॉय राईट वर्ड लिहिणार आणि “गुड बॉय” अशी पदवी त्याला मिळणार .
आमचं शुद्धलेखन बघून आमचे शिक्षक आमच्या हातावर सप्तसूर काढायचे आणि मग ते सुधारल जायचं.
ह्या पाच  भावंडांमध्ये अनुस्वार, ओंकार,एकार हे तसे फार सज्जन. पाच पाण्डवांमधले हे तीन वेगळे धनुर्धर.यांना ह्याचा ना कुठला त्रास ना कुठली तक्रार. ह्रस्व आणि दीर्घ यांच्या नादाला ते जातच नाहीत. एखाद्या समाज सेवकासारखे ते संपूर्ण वेळ समाजाची सेवा करत आपलं आयुष्य सार्थकी लावतात. हे बहुतेक सगळ्यांच्या मर्जीतले त्यामुळे व्याकरणकर्त्यांनी बऱ्याच वेळेला शब्दांच्या शेवटी नाही तर पहिले टाकलं आहे.
   विरामचिन्हे हा प्रकार माझा सर्वात आवडीचा. हे वाक्यांना पूर्ण स्वरूप देतात त्यामुळे मी यांना game changer असं म्हणतो. माझा एक मित्र आहे - 'आदित्य रानडे' खरंतर तसा हा हुशार मुलगा. पण शुध्लेखनामुळे त्यांचं जवळ जवळ होणारं प्रेम रांगोळीसारखं फिस्कटलं. खरंतर या मुलाने प्रेमपत्र खूप मेहनतीने आणि आमच्या मदतीने '‘लिहिले'’होते. पण त्यावर शुद्धलेखनाच्या एका वाक्यामुळे पाणी सांडलं. ते वाक्य पुढीलप्रमाणे-
“चांदण्यांचे कोश माझ्या, प्रियकराला पोहोचवा” या पोहोचवा मुळे तो 'भाऊ' या कॅटगरीमध्ये पोहोचला होता. कारण एका स्वल्पाविरामाने त्याच्या प्रेमाला पूर्णविराम दिला होता.
ह्या शुद्धलेखनाने खरोखर माझे बाल्यजीवन वेठीस धरले.आजही कोणी मला शुद्धलेखनाबद्दल विचारलं तर गुपचूप google वर सर्च मारतो. नाहीतर पेपर वर लिहून कुठलं बरोबर आहे ते तपासून घेतो. अहो, उद्या ब्रह्मदेवाला जरी विचारलं ना, “काय रे बाबा ? शारीरिक मधला पहिला री आणि दुसरा रि कोणता तर तों सुद्धा जगाची सगळी कामं सोडून आपली चारी डोकी या विचारात गुंतवेल. शेवटी तुम्ही महाराष्ट्रात जन्माला आला म्हटल्यावर आणि मराठी येत असताना शालेय जीवनात हा त्रास भोगावा लागणारच आहे.
कारण शब्द जर शस्त्र असले तर शुद्धलेखन नक्कीच त्याची धार आहे.

Monday, May 21, 2018

माझे (अ) शुद्धलेखन भाग -१




“मीत्रा,
काय म्हणतोस सर्व काहि कूशल आहे ना? बर्याच दीवसात भेटलो नाहि.लवकरच पूण्याला येतो आहे.तेव्हा भेटु. शीक्षकांना सुद्धा भेटायचं आहे .तूझ्या सोबत शाळेत जाऊन येईन म्हणतो.त्यामूळे वेळ बाजुला काढुन ठेव.”
हा मेसेज आशुतोष असनीकराने मला पाठवला होता.ह्या माणसाचा त्याच्या शुद्धलेखनावर प्रचंड विश्वास आहे म्हणून त्याने ते कधीच सिरीयसली घेतलं नाही.त्याची आणि माझी मैत्रीच मुळात शुद्धलेखनामुळे झाली , कारण संपूर्ण वर्गात तो आणि मीच काय त्या चुका करायचो.
माझ्या शालेय जीवनात माझं मार्कसिक शोषण जर कोणी केलं असेल तर ‘शुद्धलेखन’ याने. गणिताबरोबर दुसऱ्या नंबरला येणाऱ्या या दैत्याने माझी चांगलीच भंबेरी उडवली आहे. माझं जवळपास सत्तर टक्के शालेय बालपण हे मो.रा. वाळिंबे यांचं शुद्धलेखनाचे नियम वाचण्यात गेलं. मुळात मला शुद्ध बोलता येतं,वाचता येतं(असं मी मानतो), पण माहित नाही लिखाणाच्या वेळेस नक्की काय घडतं.आम्हाला ना शाळेत “या दिनाला त्या दीनाने अमुक अमुक केले” अशी वाक्य टाकली जायची मग पहिला दिन कोण आणि दुसरा कोण हे मी दीनवाणेपणाने  सांगायचो. दिवाळीचा तर अभ्यास विचारू नका ‘ त्या काळी ’ आम्हाला दिवाळीचं व्यवसाय दिले जाई. त्या बालवयात ह्या व्यवसायाचा गुंता सोडवण्यात काय नाकीनऊ आलेत हे विचारू नका.त्यामध्ये आम्हाला असेच प्रश्न विचारले जायचे.पण त्याची उत्तरं काय हो घरच्यांना विचारून लिहिता यायची.पण सगळ्यात भयंकर प्रकार कोणता असेल तर तो ‘ निबंध '.
आम्हाला मराठी या विषयाला गायकवाड सर म्हणून  रुद्राचे अवतार होते. प्रत्येक गोष्ट ते चिडूनच शिकवीत.कोणतीही गोष्ट आपल्या उच्च स्वरापेक्षा जास्त ओरडून सांगितली की मुलांना लगेच लक्षात राहते (घाबरून) या त्यांच्या मतांच खंडन साक्षात प्रिन्सिपॉल पण करत नसत. राग (संगीतातला नाही!!)  त्यांच्या नाकावर आणि छडीवर तांडवच करीत असे. ‘श्रावण मासी हर्ष मानसी’ ही कविता शिकवताना आम्हाला राठ जमिनीवर  प्रखर ऊन पडलय आणि त्याचे वर्णन म्हणजे ही कविता असं ते शिकवीत. त्या रुद्राचा तिसरा डोळा हा सतत शुद्धलेखनावर असे. त्यांच्या वाणी  मधून आग वर्षाव होतोय असाच वाटायचं . माझा मित्र अत्या सांबारे त्यांना 'अग्यामोहोळ' म्हणायचा.त्यांना मागे कोण बोलतोय हे लगेच कळायचं त्यामुळे "ह्यांना फिक्स तिसरा डोळा आहेच !!!अरे खरच"अश्या अफवा सुद्धा पसरल्या होत्या.त्यांच्या ओरडण्याने समोरच्या बिचाऱ्या विद्यार्थ्यांचे काळीज भस्मसात होऊन पाणी पाणी होई. बऱ्याच वेळेस तो बिचारा मीच असायचो.
खरंतर मला गप्पा मारायची प्रचंड आवड त्यामुळे मी प्रश्न-उत्तरं तोंडी पाठ करायचो. वास्तविक ‘प्रश्नाला’ ‘न’ का लागतो हे मला आज पर्यंत कळलं नाही.कारण म्हणताना आपण ‘ण’ म्हणतो. असो,मी पाठांतरात चांगला असल्यामुळे अगदी जोरदार पाठ करून ठेवायचो. पण लहानपणी आपण लेखी परीक्षेला सामोरे जातोय याचा सिरीयसनेस कधी नसायचा(नसतोच!!!). मी आठवीत असतानाची गोष्ट –
सहामाही परीक्षा मी अशीच पाठांतरावर दिली होती.त्यामुळे माझा निकाल लागला. त्यावेळी पालकसभेत माझा मराठीचा पेपर संपूर्ण वर्गामध्ये फिरवला होता.माझ्या गुणांपेक्षा माझ्या शुध्दलेखनाच्या चुकांचा आकडा जास्त होता!!!! “सगळं येऊन सुद्धा या कार्ट्याने शुद्धलेखनात मार्क घालवले, श्या!!!” या वाक्यावरून गणितात कश्या सिली मिस्टेक करतो तश्या काहीश्या झाल्या असाव्यात असं वाटलं. पण या सिली मिस्टेक नसतात. एक वेळ +, - करायला सोपं आहे पण शुद्धलेखन नाही.
मी त्यानंतर शुद्धलेखनाच्या क्लासला सुद्धा जाऊन आलो. पण ‘तेरड्याचा रंग तीन दिवस’ याप्रमाणे मला मिळालेल्या शाईपेनचं कौतुक होतं तोपर्यंतच तो क्लास टिकला. (३ते४ दिवस) आमच्या घरात तर “ घरोघरी शुद्धलेखन”, “शुद्धलेखन तुमच्या हातात”, “१० दिवसात शुद्ध करा लेखन”अशी विविध पुस्तकं आली. त्या पुस्तकांमध्ये ‘अमर कमळ बघ’ पासून तर ‘एकसमयावच्छेदेकरून’ पर्यंत सगळं होतं. पण माझ्या बाबतीत मी नसलो तरी माझे ‘ मार्क्स ’ माझ्या विरोधी होते.
एकवेळ मी दिन आणि दीन मधला फरक समजू शकतो पण ‘आणि’ तला ‘ण’ ह्रस्व ऐवजी दीर्घ काढल्याने काय होतं ? क्रीडांगणातला ‘क्री’ ह्रस्व केल्याने खेळ बदलत नाही आणि ‘मी’ चा ‘मि’ केल्याने मीपण जात नाही. पण हे शुद्धलेखन माझ्या बालवयात कड्या टाकण्याच काम करत होतं. शारीरिक ह्या शब्दाने तर मला इतका त्रास दिलाय, काही विचारू नका (अगदी ‘आत्मिक’त्रास म्हणा ना).इ आणि ई यांच्या कडे बघून इ आणि ई याच भावना आल्या आहेत.
                                                                क्रमशः

छायाचित्र -सिद्धार्थ जोशी

दुसऱ्या भागासाठी 👉🏻👉🏻https://arvaidya.blogspot.com/2018/06/blog-post.html

Wednesday, April 25, 2018

फॅशन

"हे बघ , हे कसं वाटतंय?" जग्या  ने माझ्या समोर फॅशनगली मासिक टाकत विचारलं.
"छ् नाही रे विचित्र दिसतंय हे ध्यान ; हे नको"-- मी मुखपृष्ठ बघत म्हणालो
" अरे हल्ली असेच कपडे घालतात तुला ना लेका फॅशन चा सेन्स च नाहीये"
" अरे पण हे असं, त्या पेक्षा साधा शर्ट घाल ना!!"-- मी
"अरे मित्रा फॅशन रे !!!फॅशन. तुला नाही कळणार.चल आपण कपडे घेऊन येऊ" --जग्या.
कोणाकोणाच्या काय आवडीनिवडी असतिल काही सांगता येत नाही. अगदी आपल्या सगळ्यांच्याच असतात . पण काही लोक हे पराकोटीचे तपस्वी असतात ते याच्या ही पुढे असतात.त्यांचे शौक म्हणजे बघण्यासारखे असतात.माझ्या एका मित्राला रोज अत्तर लावण्याचा शौक आहे- दुसर्यांना. सकाळपासून तो सगळ्यांना अत्तर लावत असतो (आणि मला चुना). तर माझ्या एका दिग्दर्शक मित्राला तपकीर ओढण्याची फार हौस आहे.त्याच्या मते तपकीर ओढून शिंक आली की आपले आधीचे विचार बाहेर पडतात म्हणे आणि मग नवे विचार येतात.आमच्या जग्या पांडे ला फॅशन चा शौक. फॅशनगली तर तो पोथी सारखं वाचतो. वेगवेगळे प्रयोग करतो.
 फॅशन च्या नावावर काहीही चालू शकतं यावर माझा नितांत विश्वास बसला हा तो प्रसंग. तुम्ही विश्वास ठेवू नका पण आपल्या आजूबाजूला बघाल तर या फॅशन च जाळं पसरलंय.केसांची फॅशन म्हणू नका.डोळ्यात,ओठात रिंग घालण म्हणू नका,वेगवेगळ्या रंगाचे कपडे घालायची - फॅशन. तुम्ही पॅन्ट वर घाला आणि शर्ट खाली ती सुद्धा- फॅशन.
जग्या पांडे याच माणसांमधला. त्याच्या डोक्यातल्या फॅशन नावाच्या गोमेने संपूर्ण डोकं पोखरून ठेवलंय; आणि आज त्याला फॅशनगली च्या कार्यक्रमात जायचं होतं.त्या साठी ही तायरी.'त्या' फोटो सारखी फॅशन करायची म्हणून 'आम्ही' वणवण फिरलो ; पण आम्हाला तशी विचित्र पॅन्ट आणि विचित्र शर्ट कुठे मिळाला नाही (का मिळेल?).शेवटी त्या फोटो मध्ये बदल करून स्वतः चीच एक वेगळी स्टाईल करायची हुक्की भाईंना आली.
तास -दीड तास ह्या माणसाने कपडे बदलावण्यात घालवला आणि "ढॅण्टँढॅण्" असा उभा राहिला.त्याचं ते 'बावळे सुंदर रूप खरोखर' असं म्हणायची पाळी आली होती. डोक्यावर गांधी टोपी,डोळ्यावर गॉगल, ती टाईट पॅन्टआणि तेवढाच लूज शर्ट आणि सगळ्यात कहर म्हणजे या सगळ्यांच्या खाली चप्पल!!!
मी आपला झब्बा आणि पायजमा यावरच होतो.खरं सांगू का मला न बाहेर जायचं म्हणलं ना की या दोघांशिवाय काही वेगळं सुचतच नाही.असो!!
जवळच समारंभ असल्याने आम्ही चालत अगदी पाच मिनिटात पोहोचलो खरे.पण रस्त्यावरची लोकांची तिरपी नजर चुकवत आम्ही जात होतो."ह्या लोकांना सेन्स च नाही रे फॅशन चा"असं हा जग्या वेळोवेळी म्हणत होता.कसेबसे आम्ही त्या ठिकाणी पोहोचलो.

तिथे म्हणजे फॅशनगली चा महासंगम च घडून आला होता. कोणी डोळ्यात रिंग घातली होती,तर कोणी वरती लाल शर्ट तर खाली हिरवी पॅन्ट घालून आलं होतं. आमच्या बाबांच्या भाषेत चित्काब्र!!. सगळे माझ्याकडे बघत होते. या सगळ्या राजहंसात हे बदकाचं पिल्लू कोणी सोडलं अशी माझी गत झाली होती.
दोनचार लोकांशी हा कश्यतारी  तरी फॅशनच्याच भाषेत बोल्ला आणि मग आम्ही बसायला जागा बघून बसलो. पण खरी मजा इथूनच सूरु झाली . हा पठ्ठा काय बसतच नव्हता याचा चेहरा कवराबावरा झाला.हळूच त्याने घाम टिपला. याला काहितरी होतंय याची जाणीव मला झाली.
"काय रे काय झालं?"-- मी
त्याने एका कोपऱ्यात मला नेलं म्हणजे नक्की काही तरी मेजर घोळ आहे माझ्या लक्षात आलं.
"अरे ऐक ना!!! ही पॅन्ट इतकी टाईट आहे की मला बसताच येत नाहीये. घुढग्यातून पायच वाकत नाहीये ,आणि जर का मी बसलो तर..."
ह्या गोष्टी वर काय करावं मला काहीच कळत नव्हतं.तेवढ्यात मि. सुब्रमण्यम तिथे आले आणि
"अरे इकडेss काssय करतोयस रे .चल, पुढे जाऊ " म्हणून त्याचा हात धरला आणि ओढून घेऊन जात होते.लहान मुलाला आई शाळेत सोडून जाताना ते लहान मूल आईकडे कसं बघत तसं जग्या माझ्या कडे पाहत होता.त्याच्या डोळ्यात पँटच्या निर्वाणीचं भविष्य दिसत होतं.
मला लिटरली सगळं स्लो मोशन मध्ये दिसत होतं. त्याला आता खाली बसवणार म्हणल्यावर मी आपले डोळे बंद करून घेतले. आणि पुढच्या काही वेळात कॅमेरा चे आवाज आले. मी डोळे उघडून बघतो तर काय !!! हा पठ्ठा स्टेजवर आणि खाली घुढग्यातून फाटलेली ती पॅन्ट.मी तडक त्याच्या जवळ गेलो .त्याने मला कानात सांगितलं "फॅशन रे!!! फॅशन" मला काय समजायचं ते समजलं .
आठवड्यानंतर एका छान रविवारी घरात वेगवेगळे आवाज येऊ लागले. वास्तविक रविवार म्हणजे काहीही न करण्याचा वार. त्या दिवशी जग ईकडचं तिकडे झालं तरी माझी दुपारची झोप कोणी मोडू शकत नाही.पण या आवाजाने आज जाग आली.
मी आत खोलीत जाऊन पाहिलं तर साहेबांनी त्यांचे सगळे कपडे उसवून त्याला नवीन स्वरूप देण्याचं काम काढलं होतं.
"अरे!! कसला हा पसारा?!!"
त्याने काहीही न बोलता माझ्या हातात  त्या आठवड्याच फॅशनगली दाखवलं. त्यात चक्क त्याचाच फोटो आणि तो ही कव्हर पेजवर ' न्यू फॅशन ऑफ दि वीक' असल्या मथळ्याखाली.
"बघ बघ नवीन फॅशन ट्रेंड सुरू झालाय माझ्यामुळे"
मी काही बोलणार तेवढ्यात "आता मला काम करू देत बरं सगळ्यांची नवीन फॅशन करायचीय" असं बोलून त्याचं काम सुरू केलं.
हा मनुष्य फॅशन च्या त्या गल्लीत पूर्णपणे हरवून गेला होता; आणि मी मात्र त्या गल्लीत माझे साधे कपडे शोधत होतो.

छायाचित्र - अर्पिता रोकडे

Thursday, April 12, 2018

पुढे काय ?

सकाळी १०:३० वाजता कॉलेजचं ऑफीस उघडतं. म्हणजे उघडतं १०:३० ला, पण कर्मचारी ११ वाजता येतात. मी अकरा वाजता ऑफिस बाहेरच्या लायनीत उभा होतो. कारण आज मला अकरावीचा फॉर्म भरायचा होता आणि एकदाचा मी सुटणार होतो . हो, कारण मी एका  भयंकर फेज् मध्ये  अडकलो होतो .
सांगतो-
माणसाच्या शिक्षणाचे काही महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी, ११वी आणि १२वी , आणि बी. ए. , एम.ए वगैरे. पण या सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी. माझी दहावी संपून साधारण आठवडा झाला होता. मला वाटलं होतं की सुट्टी सुरू; पण तसं नव्हतं. एका भयंकर सकाळी एक फोन आला
"हॅलो, मी अंजु मावशी बोलतेय"
"बोल मावशी "मी म्हणालो
"मग कशी चालूए सुट्टी ?"
हा प्रश्न विचारण्यामागचं करण काही वेगळच आहे हे माझ्या सारख्या पामराला कळलंच नाही.
"एकदम मस्त, फुल एन्जॉय"
हे वाक्य झाल्या नंतर एकदम गंभीर आवाजात
" हे बघ, हे सगळं ठीक आहे . पण तू आता आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर आहेस.आता जर योग्य निर्णय घेतला नाही तर...... त्यामुळे पुढे काय करणारेस्?"
'पुढे काय करणार' ह्या प्रश्नाचा विचार मी केलाच नव्हता. सुट्टी सुरू होऊन आत्ताशी एकच आठवडा झाला होता . मला सांगा कुठल्या मुलाला सुट्टी सुरू झाल्यानंतर 'आयुष्याचा' विचार कर असं कोण सांगतं? इथे दहावीची परीक्षा दिली अन् मला वाटलं संपला अभ्यास आता नुसता आराम . " पण तसं नसतं, पुढे काय आणि कसं करायचं याची तयारी करण्याचा वेळ असतो " इति आई.
हा पहिला फोन आला आणि त्या नंतर रोज बऱ्याच लोकांचे फोन येणे सुरू झाले. काही वेगवेगळे विषय सुचवायला लागले.
"ज्ञानेश चं तर ठरलं सुद्धा!!", " आमच्या मधुराचं कनी आठवीतच ठरलं होतं आय.आय. टी. ला जायचं" अशी वाक्य ऐकू येऊ लागली.
तसं पहायला गेलं तर मला लहानपणापासूनच ड्रायव्हर व्हायचं होतं. मस्त गाडीतून फिरायचं. पण मी नुसत्या सायकल वरूनच बऱ्याच वेळेला पडल्या मुळे मी तो विषयच सोडला.या सगळ्यात आमच्या घरच्यांनी विविध ठिकाणाहून माहिती काढली होती . आणि एका संध्याकाळी आमच्या घरात सभा भरली.
सभेचे अध्यक्ष बाबा आणि आई.
" आपण संदीप ला विचारुयात का इंजिनिअरिंग बद्दल?" बाबा.
"मी इंजिनिअरिंग करणार नाही"मी.
"मग मेडिकल ?"
"माझं काहीही ठरलेलं नाही"मी टिळकांसारखा ठाम पणे उत्तर देत होतो. थोडक्यात ती सभा मी बंद पाडली.
एकाने मला "मिडीया अँड कम्युनिकेशन घे; त्यात जर्नालिझम घे हां!!!" " एकदम तडफदार वर्तमानपत्रात लेख लिही”. पण तडफदार नक्की काय  लेख का वर्तमानपत्र हे नाही सांगितलं.
माझे बरेच मित्र मानसशास्त्र घेणार होते त्यामुळे त्यांच्या दवाखान्या शेजारी माझा ही असावा असं त्यांना वाटत होतं
पण खरं सांगू का , मला नसतं हो जमलं डॉक्टर ,इंजिनिअर किंवा पोलीस व्हायला . एकतर मला रक्त पहावत नाही. दुसरं म्हणजे माझं गणित कच्च आहे आणि पोलीस व्हायला जावं तर कोणी मला गाडी चालवताना दम दिला तर मी स्वतः लेन बदलतो. त्यामुळे हे तीन पर्याय शक्यच नव्हते. या  सगळ्यांसमोर एकच पर्याय दिसत होता -अॅप्टीट्युड टेस्ट.
मी आणि माझा मित्र अव्या नांदेडकर असे दोघांनी मिळून टेस्ट देण्याचं ठरवलं.ठरल्या वेळे प्रमाणे आम्ही इमारतीच्या पायथ्याशी जमलो . सगळी तयारी झाली होती. आम्ही कॉम्प्युटर वर बसलो आणि मग प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. ही अॅप्टीट्युड टेस्ट म्हणजे एक प्रकारचं कोर्ट च असतं. आरोपीच्या पिंजऱ्यात कॉम्प्युटर समोर आपण बसतो . मग प्रश्न विचारले जातात  आणि मग सिस्टीम साहेबा तुमचा निकाल देते( लावते?) . त्यात गणिताचे प्रश्न तर काय विचारू नका गुणाकार म्हणू नका ,भागाकार म्हणू नका, सुडोकू म्हणू नका.  या सगळ्या चाचण्या पार करून आम्ही पुढच्या टप्प्यावर पोहोचलो तो म्हणजे 'इंटरव्ह्यू'. या गोष्टीची मला मनापासून भीती वाटते. एका शाळेत प्रवेश घेण्यासाठी इंटरव्ह्यू घेणार होते तर त्या शाळेत भीतीमुळे मी प्रवेशच घेतला नाही. पण इथे काही पर्याय नव्हता .
जे माझा इंटरव्ह्यू घेणार होते त्यांच्या समोर मी जाऊन बसलो. पाहिले तर माझा पांढरफटक पडलेला चेहरा पाहून त्यांनी मला पाणी प्यायला दिलं. मला फार भीती वाटते हो . दिलेलं पाणी मी गटागटा संपवलं . त्यानंतर मला माझे छंद वगैरे विचारण्यात आलं . माझं गणित कसं कच्चय हे पुन्हा पुन्हा ते सांगत होते आणि त्यांनी माझ्या समोर चार ऑप्शन ठेवले . म्हणाले या चार मध्ये तू ' ट्राय ' करू शकतोस . जा जिले आपनी जिंदगी.
ती टेस्ट एकदाची संपली . अव्या ला फार्मसी आलं होतं. आम्ही गप्पा मारत जात होतो, भूकही  लागली होती.
रस्त्याच्या एका बाजूला पाणीपुरी च्या गाडीपाशी बरीच गर्दी जमली होती.
" इथली खाल्लीएस का पाणीपुरी?" अव्या ने विचारलं
" नाही रे"
"काय लेका तू, चल मी देतो पार्टी तुला"आता तुम्हीच विचार करा एखादा मित्र स्वतःहून पार्टी देतोय म्हणल्यावर ती पाणीपुरी आणि तो माणूस किती प्रसिद्ध असेल?
 मी लगेच हो म्हणलो.
आम्ही त्या गाडीपाशी गेलो, आणि मी त्या माणसाला पाहिलं आणि हादरलोच. त्या माणसाचा पाणीपुरी बनवण्याचा वेग हा लोकांच्या खाण्याच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त होता. एका वेळेस तो अनेकांना पाणीपुरी देत होता. बर हे सगळं करताना तो चुकत होता का? तर ताशातलाही भाग नाही.मला क्षणात विचार आला का याने दिली आले का अॅप्टीट्युड टेस्ट? त्या माणसाकडे बघून जाणवलं की कुठलाही क्षेत्र हे मोठं नसतं त्यात काम करणारी माणसं मोठी असतात . मन लावून काम करतात. कुठल्याही क्षेत्राला असा स्कोप नसतोच मुळी , तर स्कोप आपल्याला असतो.
काही दिवसांनी रिझल्ट लागला( किती मिळाले सांगत नाही. चांगला लागला एवढंच). त्यानंतर वेगवेगळी कॉलेजेस् पहिली , फिल्ड ठरवलं त्या फिल्ड मध्ये मला पुढची वर्ष खेळायचं होतं.
कॉलेजच्या ऑफीसमध्ये मी फॉर्म जमा केला होता. संपूर्ण नातेवाईकांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या. हो, कारण मी कोणालाच सांगितलं नव्हतं. मी माझ्या कलाने ' कला ' क्षेत्रात प्रवेश घेतला होता. वाऱ्यासारखी बातमी पसरली. मला वाटलं संपलं सगळं आता आराम पण हे कधी संपत नसतं.
एका भयंकर सकाळी फोन आला आणि दुसऱ्या बाजूने विचारणा झाली-

"मग पुढे काय करणार?"



छायाचित्र - अर्पिता रोकडे