Thursday, April 12, 2018

पुढे काय ?

सकाळी १०:३० वाजता कॉलेजचं ऑफीस उघडतं. म्हणजे उघडतं १०:३० ला, पण कर्मचारी ११ वाजता येतात. मी अकरा वाजता ऑफिस बाहेरच्या लायनीत उभा होतो. कारण आज मला अकरावीचा फॉर्म भरायचा होता आणि एकदाचा मी सुटणार होतो . हो, कारण मी एका  भयंकर फेज् मध्ये  अडकलो होतो .
सांगतो-
माणसाच्या शिक्षणाचे काही महत्त्वाचे टप्पे आहेत. पहिली ते चौथी, पाचवी ते दहावी, ११वी आणि १२वी , आणि बी. ए. , एम.ए वगैरे. पण या सगळ्यात महत्वाचा टप्पा म्हणजे दहावी. माझी दहावी संपून साधारण आठवडा झाला होता. मला वाटलं होतं की सुट्टी सुरू; पण तसं नव्हतं. एका भयंकर सकाळी एक फोन आला
"हॅलो, मी अंजु मावशी बोलतेय"
"बोल मावशी "मी म्हणालो
"मग कशी चालूए सुट्टी ?"
हा प्रश्न विचारण्यामागचं करण काही वेगळच आहे हे माझ्या सारख्या पामराला कळलंच नाही.
"एकदम मस्त, फुल एन्जॉय"
हे वाक्य झाल्या नंतर एकदम गंभीर आवाजात
" हे बघ, हे सगळं ठीक आहे . पण तू आता आयुष्याच्या महत्वाच्या टप्प्यावर आहेस.आता जर योग्य निर्णय घेतला नाही तर...... त्यामुळे पुढे काय करणारेस्?"
'पुढे काय करणार' ह्या प्रश्नाचा विचार मी केलाच नव्हता. सुट्टी सुरू होऊन आत्ताशी एकच आठवडा झाला होता . मला सांगा कुठल्या मुलाला सुट्टी सुरू झाल्यानंतर 'आयुष्याचा' विचार कर असं कोण सांगतं? इथे दहावीची परीक्षा दिली अन् मला वाटलं संपला अभ्यास आता नुसता आराम . " पण तसं नसतं, पुढे काय आणि कसं करायचं याची तयारी करण्याचा वेळ असतो " इति आई.
हा पहिला फोन आला आणि त्या नंतर रोज बऱ्याच लोकांचे फोन येणे सुरू झाले. काही वेगवेगळे विषय सुचवायला लागले.
"ज्ञानेश चं तर ठरलं सुद्धा!!", " आमच्या मधुराचं कनी आठवीतच ठरलं होतं आय.आय. टी. ला जायचं" अशी वाक्य ऐकू येऊ लागली.
तसं पहायला गेलं तर मला लहानपणापासूनच ड्रायव्हर व्हायचं होतं. मस्त गाडीतून फिरायचं. पण मी नुसत्या सायकल वरूनच बऱ्याच वेळेला पडल्या मुळे मी तो विषयच सोडला.या सगळ्यात आमच्या घरच्यांनी विविध ठिकाणाहून माहिती काढली होती . आणि एका संध्याकाळी आमच्या घरात सभा भरली.
सभेचे अध्यक्ष बाबा आणि आई.
" आपण संदीप ला विचारुयात का इंजिनिअरिंग बद्दल?" बाबा.
"मी इंजिनिअरिंग करणार नाही"मी.
"मग मेडिकल ?"
"माझं काहीही ठरलेलं नाही"मी टिळकांसारखा ठाम पणे उत्तर देत होतो. थोडक्यात ती सभा मी बंद पाडली.
एकाने मला "मिडीया अँड कम्युनिकेशन घे; त्यात जर्नालिझम घे हां!!!" " एकदम तडफदार वर्तमानपत्रात लेख लिही”. पण तडफदार नक्की काय  लेख का वर्तमानपत्र हे नाही सांगितलं.
माझे बरेच मित्र मानसशास्त्र घेणार होते त्यामुळे त्यांच्या दवाखान्या शेजारी माझा ही असावा असं त्यांना वाटत होतं
पण खरं सांगू का , मला नसतं हो जमलं डॉक्टर ,इंजिनिअर किंवा पोलीस व्हायला . एकतर मला रक्त पहावत नाही. दुसरं म्हणजे माझं गणित कच्च आहे आणि पोलीस व्हायला जावं तर कोणी मला गाडी चालवताना दम दिला तर मी स्वतः लेन बदलतो. त्यामुळे हे तीन पर्याय शक्यच नव्हते. या  सगळ्यांसमोर एकच पर्याय दिसत होता -अॅप्टीट्युड टेस्ट.
मी आणि माझा मित्र अव्या नांदेडकर असे दोघांनी मिळून टेस्ट देण्याचं ठरवलं.ठरल्या वेळे प्रमाणे आम्ही इमारतीच्या पायथ्याशी जमलो . सगळी तयारी झाली होती. आम्ही कॉम्प्युटर वर बसलो आणि मग प्रश्नांची सरबत्ती सुरू झाली. ही अॅप्टीट्युड टेस्ट म्हणजे एक प्रकारचं कोर्ट च असतं. आरोपीच्या पिंजऱ्यात कॉम्प्युटर समोर आपण बसतो . मग प्रश्न विचारले जातात  आणि मग सिस्टीम साहेबा तुमचा निकाल देते( लावते?) . त्यात गणिताचे प्रश्न तर काय विचारू नका गुणाकार म्हणू नका ,भागाकार म्हणू नका, सुडोकू म्हणू नका.  या सगळ्या चाचण्या पार करून आम्ही पुढच्या टप्प्यावर पोहोचलो तो म्हणजे 'इंटरव्ह्यू'. या गोष्टीची मला मनापासून भीती वाटते. एका शाळेत प्रवेश घेण्यासाठी इंटरव्ह्यू घेणार होते तर त्या शाळेत भीतीमुळे मी प्रवेशच घेतला नाही. पण इथे काही पर्याय नव्हता .
जे माझा इंटरव्ह्यू घेणार होते त्यांच्या समोर मी जाऊन बसलो. पाहिले तर माझा पांढरफटक पडलेला चेहरा पाहून त्यांनी मला पाणी प्यायला दिलं. मला फार भीती वाटते हो . दिलेलं पाणी मी गटागटा संपवलं . त्यानंतर मला माझे छंद वगैरे विचारण्यात आलं . माझं गणित कसं कच्चय हे पुन्हा पुन्हा ते सांगत होते आणि त्यांनी माझ्या समोर चार ऑप्शन ठेवले . म्हणाले या चार मध्ये तू ' ट्राय ' करू शकतोस . जा जिले आपनी जिंदगी.
ती टेस्ट एकदाची संपली . अव्या ला फार्मसी आलं होतं. आम्ही गप्पा मारत जात होतो, भूकही  लागली होती.
रस्त्याच्या एका बाजूला पाणीपुरी च्या गाडीपाशी बरीच गर्दी जमली होती.
" इथली खाल्लीएस का पाणीपुरी?" अव्या ने विचारलं
" नाही रे"
"काय लेका तू, चल मी देतो पार्टी तुला"आता तुम्हीच विचार करा एखादा मित्र स्वतःहून पार्टी देतोय म्हणल्यावर ती पाणीपुरी आणि तो माणूस किती प्रसिद्ध असेल?
 मी लगेच हो म्हणलो.
आम्ही त्या गाडीपाशी गेलो, आणि मी त्या माणसाला पाहिलं आणि हादरलोच. त्या माणसाचा पाणीपुरी बनवण्याचा वेग हा लोकांच्या खाण्याच्या वेगापेक्षा कितीतरी जास्त होता. एका वेळेस तो अनेकांना पाणीपुरी देत होता. बर हे सगळं करताना तो चुकत होता का? तर ताशातलाही भाग नाही.मला क्षणात विचार आला का याने दिली आले का अॅप्टीट्युड टेस्ट? त्या माणसाकडे बघून जाणवलं की कुठलाही क्षेत्र हे मोठं नसतं त्यात काम करणारी माणसं मोठी असतात . मन लावून काम करतात. कुठल्याही क्षेत्राला असा स्कोप नसतोच मुळी , तर स्कोप आपल्याला असतो.
काही दिवसांनी रिझल्ट लागला( किती मिळाले सांगत नाही. चांगला लागला एवढंच). त्यानंतर वेगवेगळी कॉलेजेस् पहिली , फिल्ड ठरवलं त्या फिल्ड मध्ये मला पुढची वर्ष खेळायचं होतं.
कॉलेजच्या ऑफीसमध्ये मी फॉर्म जमा केला होता. संपूर्ण नातेवाईकांच्या नजरा माझ्यावर खिळल्या होत्या. हो, कारण मी कोणालाच सांगितलं नव्हतं. मी माझ्या कलाने ' कला ' क्षेत्रात प्रवेश घेतला होता. वाऱ्यासारखी बातमी पसरली. मला वाटलं संपलं सगळं आता आराम पण हे कधी संपत नसतं.
एका भयंकर सकाळी फोन आला आणि दुसऱ्या बाजूने विचारणा झाली-

"मग पुढे काय करणार?"



छायाचित्र - अर्पिता रोकडे

18 comments:

  1. Khup chan mg atta pudha kay karnar apan...??aysa lihat ja👌👌😊

    ReplyDelete
  2. उत्तम!..विचारही आणि ते मांडण्याची शैलीही!

    ReplyDelete
  3. वाह भाऊ :) खासच जमलंय :)

    ReplyDelete
  4. अमोल, लेखनशैली उत्तम. चालु ठेव.

    ReplyDelete
  5. Amogh.. agdi pratyekacha Anubhav lihilay.. khupach Sundar..
    Mag ata pudhe Kay karnar?

    ReplyDelete
  6. Masta re amogh sundar vishay ani sunda mandani.. khoop relatable!! Good going

    ReplyDelete
  7. Lai bhari...Ashich mejawani punha punha de
    - maitrin aaji

    ReplyDelete
  8. Lai bhari ashich mejawani punha punha de
    - maitrin aaji

    ReplyDelete
  9. वैद्य,हे सगळं ठीक आहे पण आता इथून पुढे काय करणार? ;)
    दहावी नंतरची घालमेल सुरेख टिपली आहेस शब्दांमध्ये.

    ReplyDelete
  10. Chhaan...kharach, ha prashna ayusghyabhar wicharla jatoch! Ani saglya gharan madhe hech chitra dista 10 th chya suttit

    ReplyDelete
  11. Kamaaaalll lihilayes! Mastach re khup avadla😂😂😁

    ReplyDelete