Monday, March 26, 2018

एक शाही आजार

दोन दिवस झाले मला झोप नव्हती नुस्ता बेडवर पडून होतो . या दोन दिवसात मी फक्त ताकावरच होतो. त्याचं कारणही तसंच  होतं म्हणा मला एक आजार झाला होता -' अॅसिडिटी'.  खरंतर खूप पूर्वी  नुस्त ' अॅसिडिटी ' झाली असं म्हणायचे  पण आता त्याचं प्रमोशन आजारात झालंय. या आजाराविषयी माझ्या मनात प्रचंड चीड आहे. अहो, हा आजार  सांगून येत नाही हो ; ताप वगैरे कसा आधी डोकं दुखत मग थंडी भरते आणि मग ताप येतो.पण याचं तसं नाही हा भॉक करून येतो कि दुसऱ्या दिवशी छातीत जळजळ .
वास्तविक मला कधी जळजळ जाणवली नाही एकदाच जाणवली ज्या वेळेस माझ्या अत्यंत प्रिय मित्राने " अरे ! मी कसला अभ्यास करतोय  हँ हँ हँ!! " असं म्हणून परीक्षे मध्ये दोन पुरवण्या मागितल्या होत्या तेव्हा .

पण ऍसिडिटी ला मानावं लागेल हां ! म्हणजे बघा ना १० वर्षांपूर्वी खिजगणतीत नसलेला हा आजार आता जवळपास प्रत्येकाच्या गळ्यातलं ( छातीतलं ) ताईत हून बसलाय . एवढी प्रसिद्धी  कोणत्याही आजाराला मिळाल्याचं मला आठवत नाही .
हा आजार  जडायला काहीही कारण लागत नाही. आता माझंच बघा ना ; हा आजार मला पकडायला अतिशय शुल्लक कारण आहे . त्याचं झालं असं की -
 माझा मित्र सुहृद हा पुण्याच्या बाहेर राहतो . शाळेत तो आणि मी एकाच बाकावर बसायचो . शाळा संपली आणि तोही त्याच्या गावी निघून गेला , त्यानंतर त्याची आणि माझी भेट झाली नाही . एकत्र बसणं ते फक्त व्हॉट्सअँप  वर . अचानक त्याचा मेसेज आला "पुण्यात चक्कर टाकतोय भेटू या" आणि मग पुणेरी पद्धतीनं बेत ठरला की सकाळी मिसळ खायची ,दुपारी तो त्याची काही कामं करणार आणि दुपारचं जेवण करून त्याला स्टेशन वर सोडायचं बस्स .
ठरल्या प्रमाणे मी मिसळ खायला पोहोचलो. खरंतर मला तिथे फक्त  सुहृद अपेक्षित होता पण तिथे त्याच्या बरोबर दोन सुशील मुली ही  आल्या होत्या .
" अरे, या सुद्धा आपल्या सोबत नाश्ता करणार आहेत,त्याचं काये  परत कधी भेटणार म्हणून त्यानाही  आत्ताच बोलावलं चालेल ना ?" सुहृद.
"अरे !!चालेल ना काही हरकत नाही" मी (मी का नाही म्हणू!!)
" बरं मी मिसळ घेऊन येतो" तो म्हणाला.
"ठीक तू म्हणतोस तसं".
 आम्ही टेबल पकडलं मिसळ आली.मी आपले सारे मिसळ खाण्याच्या आधीचे सगळे संस्कार करून घेतले म्हणजे तर्री ओतणे , कांदा  टाकणे इ.
आ हा हा हा !!!! काय दिसत होती तुम्हाला सांगतो - 'मिसळ' .
मी पहिला घास तोंडात टाकला आणि जवळपास सहा ताड उडालोच!!. प्रचंड तिखट असा तो प्रकार माझ्या जिभेवर पडला आणि तळपायापासून मस्तकापर्यंत मला तिखट झोंबलं. पण समोर बसलेल्या दोन माता आणि एक मित्र यांच्या समोर काहीच करता येत नव्हतं . मी आपलं हसत तो घास गिळून टाकला. तुम्हाला सांगतो ,तो घास गिळताना आपल्या शरीरातून गरम असं काही पोटात जातंय असं जाणवलं. अहो ,टाकून उठायची ही पंचाईत . बरं मलाच तिखट मिसळ दिली होती का? कारण समोरचे तिघे मस्त आनंदाने खात होते .  तोंडचे पाणी पळणे म्हणजे काय याचा प्रत्यय मी त्या दिवशी घेतला . डोळ्यातलं पाणी तर मी आत टाकत होतो म्हणा ना!! उगाच डोळे किलकिले करून काय  बघ, उगाच हसून  काय बघ.  एक एक घास मी हळू हळू घेत होतो. भर थंडीत मला दरदरून घाम फुटला होता.
मला बघून तिथल्या वेटर ने पंखा फुल्ल केला.पण याने बाह्य शरीर थंड होतं हो, पण आत जिभे पासून जठरा पर्यंतचं सगळं वातावरण तापलं होतं त्याचं काय? काही वेळाने मला पाव पण तिखट लागू लागला . पण एवढं तिखट असून देखील मी त्यांच्या समोर हू की चू आणि हा नि हू केलं नाही( पर्याय नव्हता). एक मिसळ खाण्या मध्ये मी चार शेंगदाण्याचे लाडू , तीन खोबऱ्याच्या वड्या आणि पाच काजू च्या वड्या सम्पवल्या. सुहृद बरोबर फिरणं खरोखर जिव्हाळी लागलं होतं, कारण दुपारी तसंच  चमचमीत जेवण झालं . कसा बसा त्याला स्टेशन ला पोहोचवून मी घरी आलो .माझी हालत म्हणजे दिवसभर काम करून आलेल्या कारागिरसारखी झाली होती अत्यंत 'घामिष्ट' स्वरुपात मी होतो  . रात्री जेवण केलं नाही तसाच झोपलो.

 खरा त्रास सुरू झाला तो  रात्रीपासून  . रात्रभर झोप नाही सतत मळमळ . रात्र तशीच जागरणात सरली . दुसऱ्या दिवशी सकाळी थंडगार दूध प्यायलो पण काही फरक नाही . गुलकंद खाल्लं तरी काही नाही. हा अॅसिडिटी चा त्रास जळवांसारखा अंगाला चिकटून नुसतं रक्त आटवत होता . दुसरी रात्र ही तशीच जागरणात  गेली. मग मात्र नाईलाजाने डॉक्टरांकडे गेलो. तर त्यांनी सांगितलं की हा त्रास दोन रात्री जे जागरण झालं त्याने वाढलय. काळजी घ्या नाही तर हा त्रास वाढणार.हे 'काळजी घ्या हां!!' हेच वाक्य इतकं भयानक आहे की त्यांनेच पेशंट वर दडपण येतं. त्यांनी पथ्य लिहून दिली . मला पथ्य हा प्रकारचं आवडत नाही म्हणजे तो माझ्या पचनीच पडत नाही. एकवेळ इंजेक्शन द्या पण पथ्य नको.
माझ्या मित्रांचं यावर वेगळं मत होतं- एक म्हणे तू होमिओपॅथी ची औषध घे त्याने त्रास  एकदीवसात बरा  होतो; एक म्हणे " तू चूर्ण घे रे तुला कळणार सुद्धा नाही सकाळी आत जाताना ऍसिडिटी; बाहेर येताना गायब!!!" दुसऱ्या एका मित्राचं तर वेगळं म्हणणं होतं त्याच्या मते ऍसिडिटी हा मानसिक रोग आहे त्यामुळे मी कसलीही चिंता न बाळगता दणकून खावं!! ;   एकाने तर मला ENO घ्यायचा सल्ला दिला. हा हन्त !! त्या सारखे भयानक पेय  मी आजवर पहिले नाही .त्याच्या पण पायऱ्या असतात घेण्याच्या .म्हणजे आधी संपूर्ण पेलाभर पाणी घ्यायचं त्यात ते ENO टाकायचं आणि कुठल्याही क्षणाचा विलंब न लावता  गटागटा पिऊन टाकायचं. आणि  अरे रे !! त्याच्या झिणझिण्या मेंदूपर्यंत जातात .मी ते एकदाच घेतलं त्या नंतर त्याला तोंड  सुद्धा लावलं नाही.

पण आमच्या घरी युद्धपातळीवर तयारी सुरू होती. 'वैद्य' आडनाव असल्यामुळे घरातली जुनी आयुर्वेदिक  पुस्तकं बाहेर निघाली  आणि प्रत्येक जण मला डोस पाजू लागला आई म्हणाली की "ही घे सुतशेखर" तर आजी म्हणायची "सुतशेखर ने काही होणार नाही आलं आणि लिंबाचा रस घे" तर आजोबा आणि बाबा यांचं मत होतं ते  असं की मी रोज नीरा प्यावी. आता खरतर हा विषय घरच्यांपुरता मर्यादित नव्हता  तर  संपूर्ण महाराष्ट्रात जेवढे कुटुंबीय होते त्यांचे फोन सुरु झाले . आमच्या घरचे म्हणजे मला दुर्धर आजार झालाय कि काय असं सांगत होते  . ते काही उपाय सुचवत होते .
यात आमच्या कडे रोज आईस्क्रीम आणलं  जात होतं इतका हा  शाही आजार असेल याची कल्पनाच नव्हती . याला बाकीच्यान्सारखी क्रोसिन चालत नाहीत तर  वेगळी औषधं  , मस्तानी ,थंड दुध ,कुल्फी असे शाही उपाय लागतात .

पण या सगळ्या गुंत्यातून आमच्या घरच्यांचं ताकावर एकमत झालं आणि आमच्या घरात ताक बनवणं सूरु झालं .
अहो या जगात तिखट खाणाऱ्या विषयी माझ्या मनात प्रचंड आदर निर्माण झालाय . पोपटाविषयी तर अधिक.अहो तो तर नुसत्या मिरच्या खातो . त्या देवाला सुद्धा जास्त तिखट ,कांदा,लसूण चालत नाही  पण इथे भूतलावर बघा - वाडापावातल्या नुसत्या मिरच्या खाणारी हि लोक आहेत .

असो त्या दिवशी मी ताकाचा पाचवा ग्लास संपवला आणि मला शांत झोप लागली.
        आणि अॅसिडिटी चा हा  त्रास या अमृताने मुळापासून उपटून काढला


छायाचित्र - अर्पिता रोकडे 

34 comments:

  1. खुप सुंदर❤❤🌸

    ReplyDelete
  2. पुन्हा एकदा जमून आलंय 👍👌🤘

    ReplyDelete
  3. Kamall bhava😂😂💪🏿

    ReplyDelete
  4. Ekach number re ! Khupach relatable ahe mazyasathi ! Khupach aavadlay ! Bharich !

    ReplyDelete
  5. manalibhandari92@gmailMarch 26, 2018 at 8:32 PM

    Sundaaaar !!!! Bhai bhai Bhai Bhai !! Atishay sundarr....

    ReplyDelete
  6. खूप छान अमोघ. अभिनंदन

    ReplyDelete
  7. शाही आजाराचं वर्णन सहीच जमलंय...खूप आवडलं...!!😊

    ReplyDelete
  8. Mast .खुप छान लिहिल आहे..👍👍👍👌👌

    ReplyDelete
  9. खुपच छान

    ReplyDelete
  10. वर्णन छान केलंयस ! ����

    ReplyDelete
  11. Khass������

    ReplyDelete
  12. मस्त लिहिल आहेस भावा....😊👍

    ReplyDelete
  13. अाम्या... लेख उत्तम आहेच रे पण आपण मिसळ खायला कधी जायचं बोल. आणि हो नंतर Special ताकाची पार्टी माझ्याकडून असेल काय!

    ReplyDelete
  14. अाम्या... लेख उत्तम आहेच रे पण आपण मिसळ खायला कधी जायचं बोल. आणि हो नंतर Special ताकाची पार्टी माझ्याकडून असेल काय!

    ReplyDelete
  15. मस्त रे!!! मजेशीर!

    ReplyDelete
  16. वैद्यबंधू.... मस्त !

    ReplyDelete